समीरण बा. नागवडे
नगरपालिकेनंतर जिल्हा बॅंक निवडणुकीत दर्जाहीन राजकारण
श्रीगोंदा – राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण नकारात्मकतेकडे झुकताना दिसत आहे. मागील काही निवडणुकांमधील दर्जाहीन राजकारण पाहता, श्रीगोंद्याचे राजकारण आणि राजकारणी ‘असंवेदनशील’ बनतायेतय का? असा सवाल सामान्यजन उपस्थित करू लागले आहेत.
राजकारण म्हणजे फक्त निवडणुका लढवणं आणि जिंकणं एवढं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे. श्रीगोंद्यात मात्र गेल्या काही निवडणुकांत राजकारणाचा दर्जा घसरल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे.
सुसंस्कृत, समाजाभिमुख आणि चारित्र्यसंपन्न राजकारणाला खीळ बसून काही राजकीय मंडळींकडून दर्जाहीन वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, दमदाटी अन् मुजोरीचे राजकारण सुरू झाल्याची भावना श्रीगोंदेकरांची होऊ लागली आहे. याचा प्रत्यय नगरपालिका निवडणुकीत शहरवासीयांसह सर्वांनाच आला. नगरपालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांसह त्यांच्या गटांकडून नगरपालिकेची सत्ता दिल्यास शहरात काय विकासकामे करणार, शहरवासीयांना कोणत्या नवीन सुविधा देणार, शहर विकासाची ‘ब्लू प्रिंट’ कशी असणार, याविषयी बोलणे सोडून नेत्यांनी एकमेकांवर पातळी सोडून टीका झाली. नेत्यांच्या अन् उमेदवारांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्यापर्यंत नगरपालिकेची निवडणूक खाली घसरली होती.
या निवडणुकीतील एका ‘टिप्पणी’ची तक्रार तर थेट ‘बारामती’च्या ‘ताईं’पर्यंत गेली होती. विधानसभा निवडणुकीतही वैयक्तीक टीका-टिप्पणी झाली. परंतु ती तुलनेने सौम्य म्हणता येईल. मात्र, आता तालुक्यात नागवडे आणि जगताप दोन्ही सहकारी कारखान्यांसह जिल्हा बॅंकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्हा बॅंकेसाठी मतदान प्रतिनिधींचे ठराव करण्याचे काम सुरू आहे. मर्जीतील व्यक्तीच्या नावे ठराव मिळवण्यासाठी काही नेतेमंडळींकडून सेवा संस्थांच्या सभासद, संचालक एवढेच नव्हे तर सचिवांवर देखील ‘राजकीय’ दबाव टाकण्याचे आक्षेपार्ह प्रयत्न सुरू असल्याचे उघड गुपित आहे.
त्यातून पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि अपहरणापर्यंतचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातून राजकारण कोणत्या दिशेला अन् कोणत्या थराला चालले आहे, याची प्रचिती येते. राजकारणापेक्षा तत्व आणि मूल्यांना महत्त्व देणारे स्व. शिवाजीराव नागवडेंसारखे राजकारणी पाहिलेल्या श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही निवडणुकांपासून नकारात्मक आणि असंवेदनशीलतेची दर्शन घडवणारे दर्जाहीन राजकारण बघायला मिळत आहे.
या नकारात्मक प्रयत्नांतून नेतेमंडळी स्वतःचे उद्देश साध्य करण्यात यशस्वी होत असले, तरी राजकीय संवेदनशीलतेचा प्रश्न निर्माण होत असून, श्रीगोंदेकर या नेतेमंडळींविषयी आणि त्यांच्या कार्यपद्धतीविषयी नाक मुरडताना बघायला मिळत आहेत. केवळ निवडणुका जिंकणे हेच नव्हे, तर श्रीगोंदा तालुक्याची संवेदनशील आणि सकारात्मक राजकारणाची ओळख जपणे अन् राजकीय मूल्य, संकेत जोपासणे या कर्तव्याचा नेतेमंडळीना विसर पडत असल्याचे दुर्दैवी चित्र बदलणे गरजेचे आहे.