पुणे – पावसाने पाठ फिरविल्याने दक्षिण भारतासह देशात उत्पादनात झालेली घट मागील वर्षीचा चाळीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कांद्याची भाववाढ होण्यास सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारात महिनाभरात कांद्याच्या भावात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी घाऊक बाजारात 18 ते 23 रुपये किलो भाव मिळणाऱ्या कांद्याला 30 ऑक्टोबर रोजी 48 ते 52 रुपये भाव मिळत असल्याची माहिती ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
तर, किरकोळ बाजारात कांद्याची 65 ते 80 रुपये किलो भावाने विक्री सुरू होती. भुजबळ म्हणाले, “मागील वर्षी कांदा साठवण्यापूर्वी फेब्रुवारी व मार्चमध्ये कांद्याच्या पिकाला गारपीट व अवकाळीचा फटका बसला. परिणामी, पाण्याचा अंश असल्याने कांदा वखारीत लवकर खराब होऊ लागला. त्यामुळे, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणण्यास सुरवात केली आहे.
बाजारात दाखल होत असलेल्या कांद्यामध्ये अवघे 15 ते 20 टक्के कांदा दर्जेदार असून त्यांना चांगले भाव मिळत आहे.’ दोन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात कांद्याचे प्रतिकिलोचे भाव 25 रुपयांपर्यंत गेले होते. कांद्यासाठी हे दर समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा विक्रीस काढला. दरम्यान, यंदा दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने कांदा लागवडीत घट झाली.
परिणामी, येथील स्थानिक बाजारपेठांमध्ये मुबलक कांदा नसल्याने त्यांनी राज्यातील बाजारपेठांमधून कांदा खरेदीस सुरवात केली आहे. दरम्यान, पुणे विभागातून येथील बाजारात कांद्याची आवक होत आहे. रविवारी (दि.29) तब्बल 150 गाड्या आवक झाली.
भाव आणखी महिनाभर चढेच
राज्यासह परराज्यांतूनही वाढलेली मागणी आणि दर्जेदार मालाचे कमी झालेले प्रमाण यांमुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. आणखी महिनाभराने हळवीच्या नवीन कांद्याचे पीक बाजारात येणार आहे. तोपर्यंत भाव चढेच राहण्याचा अंदाज आहे.