शिवसेनेच्या मुख्यपत्रातून केंद्र सरकारवर जोरदार टीका
मुंबई- देशात सध्या सगळीकडे एकच मुद्दा सर्वांच्या समोर उपस्थित होत आहे तो म्हणजे वाढलेले कांद्याचे दर. वाढलेल्या कांद्याच्या दराने सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्यातच आता याच मुद्यावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. कांदा दरवाढीचा भडका आणि तडका याचा ठसका सगळ्यांनाच लागत आहे. कांद्याने आपल्या देशात राज्यकर्त्यांच्या फक्त डोळ्यांतच पाणी आणलेले नाही तर वेळप्रसंगी सत्तेवरही पाणी सोडायला भाग पाडले आहे.
हा इतिहास फार जुना नाही आणि त्याची काही पाने केंद्रातील विद्यमान राज्यकर्त्यांच्या नावेही लिहिली गेली आहेत. केंद्रातील मंडळी या इतिहासात भर घालतात की त्यापासून धडा घेत शंभरीपार गेलेल्या कांद्याला नियंत्रणात आणून शेतकरी आणि ग्राहक यांचे हित साधतात ते आता पाहायचे आहे असे शिवसेनेने म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करून दरवाढीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता. आतादेखील केंद्राने कांद्याची आयात सुरू केली असली तरी त्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. देशातील कांद्याची एकूण मागणी आणि देशांतर्गत कांद्याचा साठा यात पडलेला खड्डा या आयातीमुळे भरून निघालेला नाही. त्यामुळेच सध्या कांद्याने कुठे प्रति किलो दीडशेचा टप्पा गाठला आहे, तर बऱ्याच ठिकाणी शंभरी पार केली आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये निर्यात शुल्कवाढ जशी उपयुक्त ठरली नाही तशीच आता केलेली आयातही तूर्त तरी निष्प्रभ ठरली आहे.
कांद्याचा सध्याचा दर हा गेल्या 70 वर्षांतील उच्चांक म्हटला जात आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग आणि कांदा उत्पादक शेतकरी काहीसा सुखावला आहे, पण सामान्य माणूस मात्र रडवेला झाला आहे. केंद्रातील राज्यकर्ते ना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यात यशस्वी झाले आहेत ना सामान्य ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यात, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.