कोझिकोड -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या काल्पनिक जगात राहत आहेत. त्यामुळे देश संकटात सापडला आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
केरळमधील वायनाड या आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झालेले राहुल येथे पत्रकारांशी बोलत होते. देशात कुठला आर्थिक पेच नसल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून राहुल यांनी सरकारला लक्ष्य केले. मोदी आणि शहांचा वास्तवातील जगाशी संपर्क राहिलेला नाही. मोदींनी देशातील जनतेचे ऐकले असते तर कुठलीच समस्या निर्माण झाली नसती. वास्तवापासून जनतेचे लक्ष इतरत्र वेधणे हीच मोदींची कार्यपद्धती आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, कांद्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची खिल्ली उडवली. कांद्याचे भाव गगनाला भिडल्याचा विषय संसदेत उपस्थित झाला. त्यावेळी तुम्ही कांदे खाता का, असा प्रश्न एका खासदाराने विचारला. त्यावर कांदा आणि लसूण न खाणाऱ्या कुटूंबातून मी आले आहे, असे उत्तर निर्मला यांनी दिले.
त्यावर राहुल यांनी वायनाडमधील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली. काय खाता याचे उत्तर निर्मला यांच्याकडून अपेक्षित नाही. अर्थमंत्री असल्याने अर्थव्यवस्था अडचणीत का आहे, असे आम्ही तुम्हाला विचारत आहोत. प्रश्न विचारल्यावर गरीब व्यक्तीकडूनही समंजसपणाचे उत्तर मिळेल, असे राहुल यांनी म्हटले.