पुणे -जगभरात कांद्याला मोठी मागणी असतानाही केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात कांदा सडत आहे. त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसत असून, केंद्र सरकारने त्वरित याबाबत धोरण तयार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही त्याची निर्यात होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. हा कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशावेळी कृषी आणि वाणिज्य मंत्रालय नेमके काय करतेय, हा प्रश्न आहे. केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, वेळ निघून गेल्यावर हालचाली करण्यात काय फायदा. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित याबाबत धोरण बनवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
फडणवीसांनी दिलदारपणा दाखवावा
मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सरसकट विजेच्या बिलाची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी करून दिली. आज फडणवीस ऊर्जामंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वीज दरवाढ करण्याचा प्रश्नच येत नाही. थोडासा दिलदारपणा दाखवून त्यांनी वीजबिलाची कर्जमाफी करावी, अशी विनम्रपणे आठवण व विनंती त्यांना करावी वाटते, असे सुळे यांनी वीजदरवाढीच्या प्रश्नावर बोलताना सांगत फडणवीस यांना टोला लगावला.