नारायणगाव – सांगली, कोल्हापूर भागातहू पूरगस्तांना मदतीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून एक भाकरी पूरग्रस्तांसाठी अशा मदतीची मोहीम आज सुरु केली आहे. या मोहिमेला कोणताही राजकीय वलय न देता तालुक्यातून नागरिकांनी मोहीम सुरु केली आहे. शिरूर मतदारसंघातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन खासदार कोल्हे यांनी केले आहे.
नारायणगाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष अतुल बेनके, बाजार समिती सभापती ऍड. संजय काळे, जि. प. सदस्य शरद लेंडे, सुजित खैरे, दिलीप कोल्हे, भाऊ देवाडे, सूरज वाजगे, अमित बेनके उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा भागातील 2 ते 3 लाख लोकांना स्थलांतरित केले आहे. गंभीर आपत्तीमुळे डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेस स्थगिती दिली. नारायणगावात कोल्हे हे दाखल झाले आणि मतदारसंघातील लोकांना “एक भाकरी पूरग्रस्तांसाठी’ आवाहन केले. त्यानुसार “एक घर, एक भाकर’ हे अभियान राबविण्यात येत आहे. जुन्नर तालुक्यातून अतुल बेनके, आंबेगाव तालुक्यातील आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कार्यालय, खेड तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, माजी आमदार अशोक पवार, भोसरीमधून माजी आमदार विलास लांडे, हडपसर जनसंपर्क कार्यालय, राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्या कार्यालयात साहित्य देवून कार्यात सहभागी व्हावे. अतुल बेनके यांनी बेनके कुटुंबीयांच्या वतीने 10 हजार भाकरी व चटणी, जि. प. सदस्य शरद लेंडे यांच्या पिंपळवंडी परिसरातून 4 हजार भाकरी, चटणी, लोणचे तसेच पिंपळवंडीचे यशवंत पतसंस्थेच्या वतीने महादेव वाघ यांनी 51 हजार रूपयांचा धनादेश पूरग्रस्तांसाठी दिला.
जुन्नरच्या पत्रकारांचीही मदत
यावेळी जुन्नर तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने 5 पोती बाजरी व 50 किलो शेंगदाणे, वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने 40 हजार रूपयांचे खाद्य पदार्थ व इतर साहित्य, नारायणगाव येथील जैन समाज व जैन सोशल क्लब यांच्या वतीने 50 पाणीबाटली बॉक्स, 100 बिस्कीट बॉक्स, इतर खाद्य पदार्थ, शामराव आण्णा थोरात यांच्या वतीने 2 पोती बाजरी व 10 ब्लॅंकेट देण्याचे जाहीर केले. तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगांवकर यांनी पहिला शिधा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे दिला.
एक दिवसाचा पगार देणार
बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 50 लाख रूपयांचा निधी पक्षाच्या वतीने जाहीर केला आहे. जुन्नर तालुक्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवनेर प्रसारक मंडळ, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे जुन्नर तालुक्यातील कर्मचारी आपला एक दिवसांचा पगार या पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.