वनविभागाचे दुर्लक्ष; स्थानिक मच्छीमारांनी सुतीजाळीने मगर पकडली
रेडा (प्रतिनिधी): उजनी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणात असणाऱ्या मगरी आता चक्क भराव्या वर येऊन विहार करतात.त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना जीव मुठीत घेऊन मच्छीमारी व्यवसाय करावा लागतो आहे. रविवार सकाळी साडे आठ वाजता स्थानिक मच्छीमार यांना दीडशे किलो वजनाची मगर भराव्या वर दिसली या मच्छिमारांनी पोलिसांना कळवले, तद्नंतर वन विभागाला कळविण्यात आले मात्र वन विभागाचे अधिकारी सुट्टीचे कारण सांगून या ठिकाणी वेळेत पोहोचले नाहीत.मात्र मच्छिमार करणाऱ्या युवकांनी दीडशे किलोच्या मगरीला मासे पकडण्याच्या जाळीच्या साह्याने धरले व वन विभागातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन ही मगर केली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी की,उजनी जलाशय परिसरात जलाशय हा जुना असल्यामुळे मगरींची संख्या जास्त आहे त्यातच यंदा पाण्याने उजनी जलाशय तोडून भरल्यामुळे या जलाशयातील असणाऱ्या मगरी जलाशयाच्या भराव्यावर येऊन ठाण मांडून बसतात त्यामुळे मच्छीमार करणाऱ्या नागरिकांना मोठा धोका वाटतो आहे,मागील दोन दिवसात तर याच भराव्या वर दोन मगरी पाहण्यास मिळाल्या अशी माहिती स्थानिक मच्छिमार महादेव नगरे यांनी दिली.
रविवारी सकाळी मच्छिमार उजनी धरणावर पोचल्यानंतर भराव यावर येऊन दीडशे किलोची मगर शांत बसलेली होती. या मगरीला पकडण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या पोलिस यंत्रणेने वनविभागाच्या अधिकार्यांना भ्रमणध्वनीवर कळवले.परंतु आज रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे येण्यास वेळ लागेल असे म्हणून वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून टाळाटाळ केली मात्र स्थानिक मच्छीमारांनी आम्हीच ही मगर पकडतो म्हणून पोलिसांना ग्वाही दिली.
या उजनी जलाशय परिसरामध्ये मच्छीमार करणारे महादेव नगरे,विजयराव पाटोळे, शिवाजी साळे,शशिकांत साळे, संदीप खानेवाले,दिपक नगरे, रवी नगरे, अशोक पाटोळे,सुरज नगरे, नितीन साळे यांनी तात्काळ मासे पकडण्याची जाळी आणून एक जीवाने मगरीला पकडले व या मगरीने कोणाचा चावा घेऊ नये म्हणून एका दाव्याने मगरीचे तोंड व संपूर्ण शेपटी बांधली. मगर पकडल्यानंतर काहीवेळाने इंदापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाची गाडी पाठवली होती या गाडीमध्ये पकडलेल्या मगरीला ठेवण्यात आले व पुण्याकडे मगरीला रवाना केले.इंदापूर पोलिस स्टेशनचे महादेव जाधव यांच्यासह पोलीस मित्र या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उजनी धरण भराव्यांवर वन विभागाने लक्ष ठेवण्याची गरज
उजनी धरण हे यंदा पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे या पाण्यामध्ये असणाऱ्या मगरींची संख्या मोठी आहे व याच पगरी पाण्यातून बाहेर पडत आहेत त्यामुळे स्थानिक गावकरी व मच्छीमार करणारे नागरिक यांच्या जीवाला धोका होण्याची दाट शक्यता असल्याने या उजनी .धरणाच्या भराव यावर वन विभागाने लक्ष ठेवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.या परिसरावर वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.