- मारुंजीतील पक्षीप्रेमी अशोक मुरकुटे यांचे दातृत्व
हिंजवडी – मारुंजी येथील प्रगतिशील शेतकरी अशोक महादू मुरकुटे यांनी फुलवऱ्यावर व राखणीस आलेले एक एकर ज्वारीचे पीक पशु-पक्ष्यांची भूक भागविण्यासाठी राखून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी शेतालगत मोठा खड्डा खोदून त्यात पाणी देखील साठवून ठेवले आहे. या शेतात पक्ष्यांचे थवेच्या थवे येऊन चारापाणी घेत आपली उपजीविका भागवतात.
मुरकुटे परिवाराने संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याजवळ असलेल्या पाचाणे गावात जमीन खरेदी केली आहे. ते स्वतः संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात नोकरीला असून, पाचाणेतील जमिनीत तब्बल दीड एकर ज्वारीचे पीक घेतले आहे. एरवी शेतकरी ज्वारीचे पीक बहरात आल्यावर त्याची राखण करण्यासाठी अनेक उपाययोजना करताना दिसून येतो. परंतु मुरकुटे हे याला अपवाद ठरले आहेत. ग्रामीण भागात आजही ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे ज्वारीच्या पिकात मांडव उभा करून गोफणीने पाखरे हाकलून ज्वारीच्या पिकाची राखण केली जाते. त्यामुळे पक्ष्यांचे थवे या पिकावरून दुसऱ्या शेतकऱ्याच्या पिकावर बसताना दिसून येतात.परंतु वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पक्ष्यांना ही भूक असते आणि ती भागविण्यासाठी आपण ही संत विचारांची जोपासना केली पाहिजे, ही खुणगाठ व कौटुंबिक संस्कार मनाशी बाळगून मुरकुटे परिवाराने संपूर्ण ज्वारीचे शेत पाखरांसाठी राखून ठेवल आहे.
मनस्वी आनंद, मोठे समाधान
याठिकाणी पाखरांचे थवे येऊन मनमुरादपणे कोवळे दाणे चोचीत घेऊन आपल्या पिल्लांना भरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याने मनस्वी आनंद मिळतो. तसेच आपण कुणाचीतरी भूक भागविल्याचे मानसिक समाधान मिळते, असे त्यांनी दै. प्रभात शी बोलताना सांगितले.