मुंबई – अनेक देशात मंदी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर युरोप आणि अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ करणार आहेत. अशा परिस्थितीत जागतिक शेअर बाजारामध्ये विक्रीचा जोर कायम आहे. त्याचा परिणाम कालपासून भारतीय शेअर बाजारावर होत असला तरी भारतीय शेअर बाजार निर्देशांकांची हाणी तुलनेने कमी झाली आहे.
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 168 अंकांनी कमी होऊन 59,028 अंकावर बंद झाला. विस्तारीत पाय असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 31 अंकांनी कमी होऊन 17,624 बंद झाला.
अर्थव्यवस्था कशीही असली तरी व्याजदर वाढ करून महागाई रोखणारच असे अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळे महिन्याच्या शेवटी अमेरिका व्याजदरात वाढ करणार आहे असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. स्टेट बॅंक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली.
रेलीगेअर ब्रोकिंग या संस्थेचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की जागतिक बाजारात कमालीचे नकारात्मक वातावरण असल्यामुळे जागतिक शेअर बाजाराची निर्देशांक मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. त्या तुलनेमध्ये भारतीय शेअर बाजार निर्देशांक मात्र कमी घसरत आहेत. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप 0.73 टक्क्यांनी तर मिडकॅप 0.46 टक्क्यांनी वाढला.
दरम्यान, तेल उत्पादकाच्या संघटनेने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरविले असले तरी कच्च्या तेलाचे दर मात्र कमी होत आहेत. सध्या कच्च्या तेलाचे दर 92 डॉलर प्रति पिंप आहेत. या परिस्थितीचा भारताला लाभ होणार आहे. मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 1,144 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जर या गुंतवणूकदारांनी खरेदी चालू ठेवली तर निर्देशांकाची जास्त हानी होणार नाही. इतर देशापेक्षा भारताचा विकास दर जास्त असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराची जास्त हानी होत नसल्याचे सांगण्यात आले.