मुंबई – दहीहंडीमध्ये भाग घेणाऱ्या गोविंदा पथकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. हा निर्णय राजकीय असून, त्यावरून पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू असलेले स्पर्धा परीक्षा उमेदवारांना अधिकारी होण्याची संधी डावलली जाणार आहे. त्यामुळे या निर्णयावरून नाराजीची लाट पसरली आहे.
आधी राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील त्यावरून एकनाथ शिंदे सरकारला धारेवर धरलं. यावरून आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले,’दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देताना त्याला ५% अतिरिक्त आरक्षण दिलेलं नाही, तर ५% आरक्षण लागू असणाऱ्या खेळांच्या यादीत दहीहंडीचा समावेश केलाय. त्यामुळे कोणीही टीका करण्याचं कारण नाही.’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिल आहे.