पुणे – राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 102 टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील 355 पैकी फक्त दोन तालुक्यांत सर्वात कमी झाला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपेक्षा यंदा पावसाने राज्यात चांगली हजेरी लावली. काही भागात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर जुलै आणि ऑगस्टमध्ये जास्त असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर सप्टेंबर महिना सुरू झाला आणि पुन्हा पावसाने हजेरी लावली. ती अद्याप कायम आहे.
राज्याच्या हवामान विभागाच्या नोंदीनुसार 16 जिल्ह्यांमध्ये 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यात कोकणातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे,अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. साधारण सरासरी इतका म्हणजे 100 टक्के पाऊस झाला, असे एकूण 13 जिल्हे आहेत. त्यात मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सुद्धा 100 टक्के पाऊस झाला.त्याचबरोबर 100 टक्क्यांपेक्षा कमी आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये फक्त 5 जिल्हे आहेत. त्यात सोलापूर, बीड, लातूर आणि उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला एकही जिल्हा नाही.
राज्यातील तालुकानिहाय पावसाचा आढावा घेतला असता, 355 पैकी 179 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. 118 तालुक्यांत 100 टक्के पाऊस झाला. 50 टक्केपेक्षा कमी पाऊस फक्त 56 तालुक्यांत झाला. त्याहीपेक्षा कमी पाऊस पडलेले राज्यात फक्त दोनच तालुके आहेत.