नवी दिल्ली – ओमायक्रॉनमुळे संसर्ग वाढत आहे. मात्र हा संसर्ग जास्त गंभीर स्वरूपाचा नाही. त्यामुळे रुग्णांच्या विलगीकरणाचा कालावधी कमी करून पाच दिवस करण्याची गरज असल्याचे फिक्की या उद्योजकांच्या संघटनेने सरकारला सुचविले आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पाठविलेल्या पत्रात फिक्कीने म्हटले आहे की, विलगिकरणाचा कालावधी जास्त असल्यामुळे उद्योग व्यवसायांना मनुष्यबळाची कमतरता भासण्याचा धोका निर्माण होतो. उद्योग-व्यवसायातील 75 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायावर फारसे निर्बंध आणण्याची कसलीही गरज नाही.
त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने संसर्गाच्या आकडेवारी ऐवजी इस्पितळात दाखल केलेल्या आकडेवारीच्या आधारावर निर्बंध लागू करावेत अशी सूचना करण्यात आली. अत्यावश्यक सेवा आणि इतर सेवा त्यांची वर्गवारी स्पष्टपणे करण्यात यावी आणि गरज असेल तरच विविध सेवांना सर्वसामान्य सेवात सामील करावे.
या अगोदर लॉक डाऊनमुळे जनतेच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे आता अशी भीती पसरणार नाही याची स्थानिक प्रशासनाने आणि केंद्र सरकारने काळजी घेण्याची गरज असल्याचे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले. निर्बंधाचा परिणाम आयात -निर्यातीवर होणार नाही याची सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज आहे असेही सांगण्यात आले.