श्रीनगर – भारत आणि पाकिस्तानकडून शांततेची इच्छा व्यक्त होत असल्याच्या घडामोडीचे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वागत केले. त्याचवेळी, काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांत गुप्त पातळीवर नव्हे; तर खुली चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गुप्त पातळीवर चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. त्याचा संदर्भ घेऊन ओमर पुलवामा जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते. भारत आणि पाकिस्तान एकमेकांना धमकावण्याऐवजी मैत्रीची भाषा करत असल्याची बाब चांगलीच आहे. पण, अजूनही बरेच काही करावे लागणार आहे. केवळ जम्मू-काश्मीरचेच नव्हे; तर संपूर्ण दक्षिण आशियाचे भले दोन्ही देशांच्या मैत्रीवर अवलंबून असल्याची भूमिका आमचा पक्ष (नॅशनल कॉन्फरन्स) नेहमी मांडत आला आहे, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची नुकतीच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. त्यावरून ओमर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ती चौकशी म्हणजे केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याची किंमत असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.