पुणे -महापालिकेच्या “पीएमसी केअर’ या ऑनलाइन संगणक प्रणालीवर नागरिकांकडून तक्रार करण्यात आल्यानंतर त्याची कोणतेही शहानिशा न करता ती परस्पर बंद करणे आता अधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. हे प्रकार वाढत असून त्याबाबत महापौर आणि आयुक्तांकडे तक्रार प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही तक्रारीचे प्रत्यक्ष निराकरण झाल्याशिवाय तसेच विभाग प्रमुखांनी त्याची खातरजमा केल्याशिवाय ती बंद करू नये, असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. तसेच हे प्रकार या आदेशानंतरही कायम राहिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
पुणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना उपलब्ध सेवा सुविधांबाबतच्या कामकाजासाठी किंवा त्यांचे तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेत वारंवार भेटी द्यावी लागते. यासाठी महापालिकेमार्फत नागरिकांना घरबसल्या विविध तक्रारी ऑनलाइन पद्धतीने नोंदविता याव्यात तसेच त्यांचे जलदरीतीने निवारण करणेकरिता पी.एम.सी. केअर पोर्टल कार्यान्वित केले आहे. त्यानुसार, महानगरपालिकेकडे प्राप्त तक्रारींचे निवारण झाले आहे अगर कसे, नागरिकांशी संपर्क केला आहे किंवा नाही याची जबाबदार अधिकाऱ्यांकडून शहानिशा न करताच ही तक्रार केली जाते. अशा प्रकारच्या तक्रारी महापौर यांच्याकडे तसेच आयुक्त कार्यालयाकडे लेखी, दूरध्वनी व प्रत्यक्ष भेटून नागरिक देत आहेत. तसेच महापौर, पदाधिकारी व नगरसेवक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या शिवाय नागरिक सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त करीत आहेत. परिणामी महानगरपालिकेची प्रतिमा जनमानसात खराब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी तातडीने चुकीच्या पद्धतीने काम टाळण्यासाठी बंद करण्यात येत असलेल्या तक्रारीची दाखल घेत याबाबतचे लेखी आदेश दिले आहेत
काय आहेत आयुक्तांचे आदेश
प्रत्यक्ष तक्रारींचे निराकरण न करता प्रणालीमध्ये तक्रारी बंद करण्यात येत आहेत. आपल्या सेवकांमार्फत तक्रारींचे निराकरण न करता प्रणालीमध्ये या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी तक्रारींचे निवारण करून त्या प्रणालीमध्ये बंद करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष जागेवर काम न करता कोणत्याही तक्रारी बंद करण्यात येऊ नयेत. भविष्यामध्ये अशा स्वरुपाची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व भविष्यातील कामकाज असमाधानकारक असल्यास आपणावर योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.