कबूल आहे की, तुम्ही खूप ऊन सोसलंत. मान्य आहे की, रोहिणीचा नाही तरी वळवाचा तरी पाऊस यावा, पण त्याची उगीच वाट पाहू नका. अजून पंधरा दिवस शाळांना सुट्ट्या आहेत. चवींचा बराच महोत्सव साजरा करणे अजून बाकी आहे. शेतं तयार आहेत, पण पाऊस येणं अजून बाकी आहे. आषाढ आलाय, तर आखाड तळणं अजून बाकी आहे.
दुपारची जेवणं होऊन वामकुक्षी झाली, चारबीर वाजले की, काही खावंसं वाटतं. म्हातारी आईसुद्धा म्हणते, “तोंड हलवायला काही तरी दे.’ मुरमुऱ्याचा चिवडासुद्धा चालतो तिला. मराठवाड्यात त्याला “भपका’ असा शब्द आहे. खाणे नाही, खाण्याचं नुसतं प्रदर्शन! मुरमुऱ्याच्या चिवड्यानं काही होत नाही, मग “खारोड्या काढा’ म्हणतात. बाजरीच्या करतात. बाजरीचा भरडा करतात. शिजवतात. त्यात तिखट-मीठ घालतात आणि छोटे-छोटे गोळे करून कडक उन्हात वाळवतात. त्या खारोड्या.
कांदा आणि शेंगदाण्यासोबत कुडूम-कुडूम खातात. त्यानंतर सातूचं पीठ गुळात कालवून खातात. ज्या भांड्यातून ते खाल्लं (किंवा प्यायलं), तेही विसळून प्यायचं असतं. रामनवमीला लाह्यांचं कालवलेलं पीठ हा प्रसाद असायचा. घरीही ते करता येतं. बदली होणारी नोकरी असेल तर आणि बदली हवी असल्यास धिरडे करा. आंब्याच्या रसाबरोबरसुद्धा ते लावून खाता येतील. रसनेचा आनंद तर मिळेलच, पण बदलीही मिळेल. थोडं ऊन उतरल्यावर आपण पुन्हा झाडांकडे जाऊ.
“हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ असं गाणं म्हणत, आपण काश्मीर न पाहिल्याचं दुःख विसरायचं आणि समोरच्या स्त्रीलाच “दिसशी तू नवतरुणी काश्मिरी’ म्हणायचं. ‘एवढी का कुरूप आहे मी?’ असं ती नाही, तर चिंच आपल्याला विचारते. आपल्याला चिंचेची ओळख करून द्यायची तर एकच वाक्य- चिंचा दोन प्रकारच्या असतात. आतला गर (गीर) लाल असणाऱ्या आणि फिक्या रंगाच्या गराच्या दुसऱ्या प्रकारच्या चिंचांचे प्रमाण जास्त आहे. गरज आहे चिंचेच्या अलक्षित सौंदर्याकडे लक्ष देण्याची.
चिंचोक्यातून उगवलेला चिंचेचा पहिला पहिला अंकुर मोठा पाहण्यासारखा असतो. सुरुवातीला चिंचोका धरून ते रोप प्रश्नार्थक चिन्हासारखा आकार धारण करतं. मग कधी तरी चिंचोका गळून पडतो आणि रोप नीट उभं राहतं. अठ्ठावीस पानांच्या त्या पुंजक्यावर हळुवार हात फिरवून पाहा. मखमली स्पर्श कशाला म्हणतात, ते कळेल. चिंचेच्या इवल्या कळीत आणि फुलात जगातला सगळा नाजूक नखरा अवतीर्ण झाला आहे. फुलांच्या बहराला खास नाव असलेले चिंच हे एकच झाड आहे. बाकीच्यांना फुलोरा, बहर इ. समान शब्द आहेत. पण “चिगर’ असतो फक्त आणि फक्त चिंचेचा. बोधे लिहितात- पिवळ्या नांगड्यावर गुलाबी कळ्या फुललेल्या. प्रत्येक कळी टम्म फुगलेली. कळी फुगली की, चार पाकळ्या पसरतात. आत पिवळे चार केशर. मंद रंगाच्या गुलाबी पाकळ्या. फुलांची चवही आंबट-गोड.
मी चिंचेचा पाला खाल्ला आहे.
चिगुराची भाजी करण्याची कल्पनाच मला क्रूरपणाची वाटते, पण करणारे करतात. गुंजेप्रमाणे चिंचेचा पाला खाणाऱ्या गायकांबद्दलही मी वाचले आहे. गाण्याच्या मैफलीला जाण्यापूर्वी महान गायक तानसेन चिंचेचा पाला खाऊन जात असत, अशी आख्यायिका ग्वाल्हेरात आहे. ती खरी असेल वा खोटी- पण ग्वाल्हेर शहरात एका मोठ्या चिंचवृक्षाखाली त्यांची कबर आहे, हे मात्र सत्य आहे. चैतन्य महाप्रभूंना चिंचेच्या वृक्षाखाली बोध झाला. हा चिंचेचा वृक्ष आजही वृंदावनात आहे, असं म्हणतात. व्यवस्थितपणे केलेले, फोडलेल्या चिंचेचे लाडू दोन-दोन वर्षं टिकतात. हिंग आणि मिठाच्या पाण्याचा स्पर्श देऊन हे चिंचेचे लाडू केले जातात. झाडावर दीर्घ काळ टिकून राहणारं असं हे गमतीदार फळ आहे. “गोईण’मध्ये चिंचेविषयीचं आदिवासींचं एक गाणं डॉ. राणी बंग यांनी दिलंय. त्यावरून कच्च्या चिंचा सहा महिने व पिकलेल्या चिंचा झाडावर सहा महिने राहतात, असा बोध होतो.
“माझ्या मन आवडीनं, झाड लावी ग चिंच
आन् तिची सावली, उंच उंच!
आपयेला हस्तकानं (हातानं) ग
झाड रोवयलो चिंच
अन् तिचा फळ “बारो’ (बारा) मास
तुकाराम बोले।।’
मोहाचे झाड मी पाहिले नाही. पण श्राद्धपक्षाला त्याच्या पानांच्या पत्रावळीवर जेवलो मात्र आहे. आदिवासी स्त्रिया झाडांना आपली ‘गोईण’ म्हणजे मैत्रीण मानतात. “गोईण’ पुस्तकात पहिली मैत्रीण मोहाचे झाड आहे. बाकी झाडांना अर्धे ते एक पान जागा मिळाली, तर मोहाला सहा पाने मिळालीत; म्हणजे आदिवासींच्या जीवनात हे झाड अनेक कारणांनी महत्त्वाचे आहे. इतके की, आदिवासी या मोहाच्या झाडाला देव मानतात.
माझंही मन अजून मेंदीच्या पानावर झुलतंय. कारण सातवीपर्यंत मी ज्या शाळेत शिकलो, त्या वस्सा येथील शाळेला सुंदर आणि विस्तीर्ण असे मेंदीच्या पूर्ण वाढलेल्या झाडांचे कुंपण होते. तिची छोटी-छोटी चोपडी पाने अजून डोळ्यांसमोर नाचताहेत. तिची वाळलेली लहानगी गोलसर वाटाण्याच्या आकाराची फळं अजूनही डोळ्यांसमोर डोलताहेत. इजिप्त, सुदान आणि भारत या तीन देशांत मेंदीच्या पानांचा पुरवठा करण्याकरता मोठ्या प्रमाणात मेदींची लागवड केली जाते. भारतात पंजाब व गुजरात या राज्यांत मोठ्या प्रमाणावर आणि मध्य प्रदेश व राजस्थानात कमी प्रमाणात लागवड केली जाते.
हातांवर मेंदी काढणे, ही एक कला आहे. मेंदीच्या रचनेची पुस्तकं बाजारात मिळतात. गौरवर्ण स्त्रियांच्या नुसती तळहातावरच नाही, तर मळहात आणि कोपरापर्यंत मेंदी काढता येते. “खुलविते मेंदी माझा रंग गोरापान’ हे खरं आहे. पुरुषसुद्धा दाढी, भिवया, मिशा आणि पांढरे झालेले केस मेंदीने रंगवतात. लग्नसमारंभात- विशेषतः उत्तर भारतात- मेंदी काढणे हा एक महत्त्वाचा सोहळा असतो. हिंदीत मेंदीसाठी हिना असा शब्द आहे. मेहंदीसुद्धा आहे. दोन्ही शब्द उर्दूत आहेत.
वसंताची काढती, अगदी शेवटची पावलं दिसतात वरुण ऊर्फ वायवर्ण या वृक्षात. उष्ण व दमट हवामानात विशेष चांगला वाढणारा हा वृक्ष संपूर्ण भारतात आढळतो. याची बेलासारखी तीन पर्णिकांची संयुक्त पानं असतात. हिवाळ्यात पूर्ण पानगळ होते आणि एप्रिलमध्ये हा बहरू लागतो. श्रीश लिहितात : वरुणाची फुलं म्हणजे देठाजवळच्या पानांसारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या पाकळ्या व त्यामधून निघालेल्या फिकट जांभळ्या पुंकेसरांचा झुबकाच! अत्यंत आकर्षक व नाजूक फुलांनी बहरलेला वरुणाचा वृक्ष वसंत ऋतूत खूपच देखणा दिसतो. जून फुलांच्या पाकळ्या पिवळ्या होतात आणि बहर संपता-संपता नवी पालवी येते. सुरुवातीला हिरवी दिसणारी वरुणाची लंबगोलाकार फळं पिकल्यावर लाल होतात. त्यामधल्या पिवळ्या गराचा वास मात्र आंबूस, थेट शिळ्या बिअरसारखा.
मोहरीचे पीक महाराष्ट्रात घेतले जात नाही, पण विहिरीच्या जवळ शेतात अनाहूतपणे उगवलेली मोहरीची झाडे आपण नक्की पाहिली आहेत. मोहरीचे चार तरी प्रकार आहेत. तिची उंची प्रकारानुसार एक ते दोन मीटर असते. पाने 15 से 30 सेंमी लांब, साधी, संवृत्त म्हणजे देठ असलेली लवदार असतात. खोडाच्या तळाकडील पाने वरच्या पानापेक्षा मोठी व वीणाकृती असतात. फुले पिवळ्या रंगाची असतात. ज्यांचे चित्रीकरण उत्तर भारतात झाले आहे, अशा अनेक हिंदी गाण्यांत नायक-नायिका मोहरीच्या पिकात नाचत असतात. ती शेतं इतकी सुंदर असतात की, त्यांच्यापुढे नाचणारे नायक-नायिकासुद्धा पाहायला नकोसे वाटतात. मला अशा शेतांमध्ये जाऊन एकदा नाचायचे आहे.
मराठीत “राईचा पर्वत करणे’ अशी म्हण आहे. राई हा मोहरीसाठी मराठी शब्द आहे. मराठवाड्यात लोणच्याला रायतं म्हणतात, कारण लोणच्यात वाटलेली मोहरी हा महत्त्वाचा घटक असतो. लोणची अनेक असतात- म्हणून आंब्याचं रायतं, लिंबाचं रायतं, वगैरे. शेतात फुटलेली मोहरीची झाडं ही फोडणीत न फुटलेल्या मोहरीचं कोरड्यास असलेलं भांडं विसळून किंवा धुऊन टाकलेल्या पाण्यातून गेलेल्या मोहरीतून येतं. काही का असेना, त्यामुळे पीक न घेता संबंध मोहरीचं, पिवळ्या फुलांचं झाड आपल्याला दिसतं ना! फोडणीतली मोहरी फार हट्टी असते. तेलतव्यातले (हा कढईसाठी वापरण्यात येणारा मराठवाड्याच्या बोलीतला सुंदर शब्द) तेल गरम झाले की, आधी मोहरी टाकायची- तडतड आवाज करीत टाकलेली प्रत्येक मोहरी फुटेपर्यंत लसूण किंवा जिरे टाकायचे नाहीत. असे ते टाकले, तर मोहरी फुटत नाही आणि न फुटलेली मोहरी वाईट लागते; कोरड्यासाची चव बिघडवते!
रोहितक (अमुरा रोहितक) हे नितांत सुंदर झाड मी मंचरच्या महाविद्यालयात पाहिले आहे. तज्ज्ञांचे तर असे म्हणणे आहे की- सुंदर पाने लाभलेल्या, प्रसन्न, सदाहरित भारतीय वृक्षोत्तमांची यादी करायला घेतली, तर पहिल्या पाचांमध्ये रोहितक मोजावा लागेल. मध्यम आकाराचा हा एक डेरेदार वृक्ष आहे. पाने सुंदर, खूप मोठी, पन्नास सेंमी ते एक मीटर लांबीची असतात. गडद, तजेलदार हिरव्यागार पानांवरच्या शिरा फारच सुंदर दिसतात. ती भरगच्च असल्यामुळे बाकी अंगांकडे लक्षच जात नाही. फळात येणाऱ्या तीन बिया लालभडकतेमुळे उठून दिसतात. अतिशय देखणा असा हा वृक्ष पुण्यात पाहायला मिळेल. एक तर अगदी पुण्याच्या जोगेश्वरी मंदिराजवळ आपल्या प्रसन्नतेसह विराजमान झालेला आहे.
बोरकरांची ओळ आहे- “रुमडाला सुम आले गं!’ रुमड म्हणजे उंबर. औदुंबर. उंबराला फूल येणे ही अशक्यप्राय गोष्ट असते. उंबराचे फूल कोणाला दिसत नाही. पण फुलाशिवाय फळ अशक्य. तर, उंबराचे फळ हीच त्याची फुले. उंबर आणि अंजीर या फायकस प्रजातीमध्ये फुले अत्यंत सूक्ष्म आकाराची असून फुलोरा कुंभाच्या अगर कुंडाच्या आकाराचा असतो. उंबराच्या वरच्या टोकाला एक छिद्र असते आणि आतल्या अस्तरावर असंख्य फुले असतात. यामध्ये नरफुले आणि मादीफुले निरनिराळी असतात. वरच्या बाजूने किडे आत जातात. वरच्या बाजूला नरफुले असतात. इथून किड्यांना सरळ जाता यावे म्हणून केस असतात. ते किड्यांना पुन्हा बाहेर येऊ देत नाहीत. नरफुलांवरचे परागकण घेऊन किडे मादीफुलांपर्यंत जातात आणि परागसिंचनातून आतमध्ये मोहरीच्या आकाराची फळं तयार होतात. या किड्यांनी परत बाहेर येण्याचा प्रश्नच नसतो. मग किडे आतमध्ये अंडी घालतात आणि नव्या किड्यांना जन्म देतात. पंखवाले किडे. पक्षी उंबरातला गर खातो, पण त्यात तयार झालेली फळं त्याला पचत नाहीत. मग ती त्याच्या विष्ठेतून एखाद्या फांदीवर, कडेकपारीत पडतात. ही फळं फांदीतील, फटीतील किंवा जमिनीतली ओल धरतात व त्यातून उंबराची रोपं तयार होतात. पुष्कळदा उंबर आणि कडुनिंब एकत्र वाढतात, याचे कारण हेच आहे. व्यंकटेशस्तोत्र लिहिणाऱ्या कवीला हे विज्ञान माहीत होते.
काकविष्ठेचे झाले पिंपळ त्याते निंद्य कोण म्हणे?
विष्ठेतून जन्मलेले उंबर, पिंपळ पवित्र मानले जातात. अंडी घातलेले किडे जन्माला येतात, तसतसे हिरवे उंबर लाल होत जाते. उंबराच्या एका फळात इतक्या मोठ्या संख्येत घडामोडी घडतात. पक्व फळांतून बाहेर पडलेले हे किडे पुन्हा मरायला म्हणून दुसऱ्या उंबराच्या आत शिरतात! अशी ही गंमत आहे. उंबराचे फळ मधुर, शीत व शक्तिवर्धक आहे. भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपू या राक्षसाचे पोट नखांनी फाडून त्याचा वध केला. हिरण्यकश्यपूच्या पोटात अतिदाहक विष होते. त्याला फाडण्याने विष्णूच्या नखांचा दाह झाला. हा दाह शमविण्यासाठी लक्ष्मीने उंबराची फळे आणली. त्या फळांत विष्णूने आपली नखे खुपसली आणि त्याचा दाह शांत झाला. तेव्हा त्यांनी औदुंबर वृक्षाला वर दिला की, “तू कल्पवृक्ष होशील, तू नेहमी फलयुक्त राहशील. मी लक्ष्मीसहित तुझ्याजवळ राहीन.’
– विश्वावसू काशिकर