विज्ञान असं सांगतं की, चंद्राचा पृथ्वीभोवतीचा भ्रमणकाळ आणि स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणेचा काळ सारखाच असल्यानं आपल्याला नेहमी त्याची प्रकाशित बाजूच दिसते. मागची अंधकारयुक्त बाजू कधीही दिसत नाही. अनेक घटना आणि व्यक्तींबाबतही असंच असतं. त्यांची प्रकाशित-म्हणजे प्रसिद्ध-बाजू माहीत असते पण काळी बाजू माहीत नसते.
आपले पंतप्रधान फ्रान्सच्या “बॅस्तिल डे’ या राष्ट्रीय दिवसाचे मुख्य पाहुणे होते. हा दिवस फ्रेंच राज्यक्रांतीचा उगम म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बॅस्तिल या तुरुंगवजा किल्ल्यातून हजारो कैदी निसटले आणि त्यांनी जुलमी राजे-रजवाड्यांवर हल्ला करून लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. फ्रान्सच्या “स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या ब्रीदवाक्याचा आरंभबिंदूही तोच आहे. हे अर्थातच संस्मरणीय आहे. पण या घटनेलाही काळी बाजू आहे.
फ्रेंच राज्यक्रांतीचे अध्वर्यू दॅंतॉं आणि रॉबस्पिए हे दोघे खरं तर शांतता आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते. पण मिळालेल्या नेतृत्वाची नशा डोक्यात गेल्यामुळे त्यांनी भयानक नरसंहार आरंभला. राजेशाहीशी अगदी किंचित का होईना संबंध लक्षात आला की त्या व्यक्तीचा गिलोतीन यंत्राचा वापर करून शिरच्छेद करण्यात दोघांनीही पुढाकार घेतला. पॅरिस आणि इतर शहरांमध्ये अक्षरशः रक्तामांसाचा चिखल झाला. अर्थात या दोघांचा अंतही त्यांनी वापरलेल्या गिलोतीनच्या पात्याखालीच झाला.
जगात अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांची काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. अगदी अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी आणि सुरुवातीचे राष्ट्रपतीही कृष्णवर्णीय गुलामांना राबवून घेत असत असं आढळून आलेलं आहे. ज्या जपानचा आपण शिस्तबद्ध, गुणवत्तेसाठी आग्रही आणि वक्तशीर म्हणून गौरव करतो त्या जपाननं गेल्या शतकात रशिया, चीन आणि कोरिया या देशांवर आक्रमण करून तेथील लोकांवर अनन्वित अत्याचार केले. इतकं की चांगल्या आणि प्रतिष्ठित घरांतील कोरियन स्त्रियांना वेश्यागृहात डांबून त्यांचा उपभोग घेतला गेला. अशा स्त्रियांना त्यांनी जपानी इयान्फू म्हणजे “चैनीसाठीच्या’ स्त्रिया असं संबोधायला सुरुवात केली.
अलीकडेच हॉलिवूडचा नामांकित अभिनेता केव्हिन स्पेसी यानं आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अनेक व्यक्तींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. आणखीही काही अभिनेत्यांची, निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची काळी बाजू उजेडात येऊ लागली आहे. आपल्याकडेही मध्यंतरी अशी एक वावटळ उठली होती. काही साधु-पुरुषांची काळी बाजू उघडकीला आल्यानं त्यांना न्यायालयानं शिक्षा ठोठावल्याची उदाहरणं आपल्याकडे झाली आहेत.
ब्रिटिशांनी भारतीयांवर खूप अत्याचार केले. जालियनवाला बाग हत्याकांड, पुण्याचा प्लेग अशी कितीतरी उदाहरणं आहेत. स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या ब्रिटिशांची ही काळी बाजूच म्हटली पाहिजे. तेव्हा आपण ज्यांना खूप मोठे समजतो त्यांनाही काळी बाजू असू शकते हे लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात थोरांचे गुण ध्यानात घेऊन अवगुणांकडे डोळेझाक केली पाहिजे. कितीही मोठा माणूस असला तरी तो शेवटी माणूसच आहे हेही यामुळे अधोरेखित होतं. भारतीय समाजात व्यक्तींचं दैवतीकरण होत असल्यानं ही बाब महत्त्वाची ठरते.
आपण आत्मपरीक्षण करून आपली काही काळी बाजू आहे का ते पाहिलं पाहिजे आणि सभोवतालच्या माणसांकडेही चिकित्सक दृष्टीनं पाहिलं पाहिजे.
– श्रीनिवास शारंगपाणी