कोलकाता – भाजपने “बेटी बचाओ’चा नारा दिला होता. आता तुमचा नारा कुठे आहे? आज मणिपूरसह संपूर्ण देश जळत आहे. बिल्किस बानो प्रकरणातल्या आरोपींची जामिनावर सुटका झाली होती. वादग्रस्त ब्रिजभूषण सिंग यांनाही कुस्ती प्रकरणात जामीन मिळाला आहे. या सगळ्या प्रकारांमुळे देशातील महिला संतप्त झाल्या असून येत्या सार्वत्रिक निवडणुकीत या चिडलेल्या महिलाच तुम्हाला देशाच्या राजकारणातून बाहेर फेकून देतील, असे प्रतिपादन तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
ममता म्हणाल्या की, भाजपचा सभ्यतेचा बुरखा केव्हाच फाटला आहे. मला पंतप्रधान मोदींना विचारायचे आहे की मणिपूरमधील घटनेने तुम्हाला थोडे तरी दु:ख झाले का? तुम्ही पश्चिम बंगालकडे बोट दाखवता; पण तुम्हाला माता किंवा बहिणींबाबत प्रेम नाही का? मला सांगा, कधीपर्यंत मुली जाळल्या जाणार, दलित, अल्पसंख्याक मारले जाणार? निरपराध माणसे मारली जाणार?