नवी दिल्ली – ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेच्या संदर्भात उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आज म्हणजे रविवारी वैष्णव यांनी अपघाताशी संबंधित मोठी माहिती सांगितली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रकरणाचा तपास केला असून दुर्घटनेचे कारण काय होते आणि त्याला जबाबदार कोण आहे याची माहिती आता मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगमधील बदलामुळे हा अपघात झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजारपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. इलेक्ट्रॉनीक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसून येते आहे.
अंतिम अहवाल येईपर्यंत आपल्याला थांबावे लागेल असे वैष्णव यांनी नमूद केले. तीन रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. विस्कळीत झालेली रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरू करण्याला आमचे प्राधान्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच घटनास्थळाची पाहणी केली आहे. सर्व मृतदेह बाजूला करण्यात आले असून आजच पुन्हा सेवा सुरू करण्याबाबत काम सुरू केले आहे. बुधवारपर्यंत काम पूर्ण होऊन सेवा सुरळीत व्हावी असे आमचे लक्ष्य असल्याचे वैष्णव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
दरम्यान, लवकरात लवकर येथील स्थिती सामान्य केली जावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही म्हटले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी येथे मोफत रेल्वेगाडी चालवल्या जात आहेत. दुर्घटना कशामुळे घडली याच्या कारणांचा शोध सुरू आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रूपये दिले जाणार आहेत.