पिंपरी – पावसाने दिलेली उघडीप आणि हवेतील ओलावा कमी झाल्याने मॉन्सूनने वेगाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यातही परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक हवामान होत असल्याने महाराष्ट्रातूनही लवकरच माघार घेण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मात्र, यामुळे वातावरणातील उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
मॉन्सूनने दहा दिवसांपूर्वीच परतीचा प्रवास वेगाने सुरू केला आहे. मंगळवारी (दि. 6) संपूर्ण राजस्थान, उत्तरप्रदेशच्या बहुतांशी भाग, मध्य प्रदेश व गुजरातच्या अनेक भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यातच हा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे स्थिती आहे. उद्यापर्यंत (शुक्रवार) हवेचे दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.
मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात अनेक अडचणी निर्माण होत असल्याने वातावरणात दररोज बदल होत आहेत. अगदी ऑक्टोबर महिन्यातही पावसाने हजेरी लावल्याने पिंपरी-चिंचवडकरदेखील आश्चर्यचकीत झाले होते. तर दिवसभर ढगाळ वातावरण राहत आहे. तर ऑक्टोबर हिटदेखील वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. स्कायमेट वेदरने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील पंधरा दिवसांत अकरा दिवस सूर्यदर्शनाची शक्यता अधिक आहे. तर उर्वरित चार दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. या कालावधीत कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहणार आहे.