नगर – लाखो भाविक वारकरी वर्षानुवर्ष पंढरपूरची वारी करत आहेत. प्रशासनाची मदत मिळाली अथवा न मिळाली तरी ती सुरूच राहणार आहे. मात्र शासन आणि प्रशासन यांची देखील जबाबदारी आहे. नगर जिल्ह्यातून एकूण 260 वारकरी पालख्या पंढरीच्या आषाढी वारीसाठी जातात. प्रत्येक दिंडीचे मुक्कामाच्या ठिकाणी असणारी मंगल कार्यालये, जि. प. शाळा, महाविद्यालये ताब्यात घेण्याच्या सूचना महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच पंढरी वारीसाठी जाणाऱ्या दिंडी प्रमुखांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळ बुवा मकाशीर, गोसावी महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, महेंद्र गंधे, अभय आगरकर राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांना आवश्यक तो संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. दिंडी चालकांनी आपली आवश्यक ती माहिती मुक्कामाचे ठिकाण दिंडीतील वारकऱ्यांची संख्या याची माहिती प्रशासनाला द्यावी. पाणी, आरोग्य, सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. पुण्यातील दिंडीच्या धर्तीवर हे नियोजन केले आहे, अशी माहिती वारकऱ्यांच्या सेवेच्या नियोजनाचे हे पहिले वर्ष आहे पुढील वर्षी कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी पूर्वतयारीचे नियोजन केले जाईल. तसेच पोलिसांची गस्त राहणार आहे.
दोनशे एकर भूसंपादनाचा प्रस्ताव
पंढरपुरात आषाढी वारीसाठी राज्यातून दिंड्या पोहोचल्या की त्यांच्या मुक्कामाच्या जागेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने पंढरपुरात 65 एकर जागा संरक्षित केली. ती जागा अपुरी आहे. त्यामुळे यंदा रेल्वेची सोळा एकर जागा दिंडी तळासाठी उपलब्ध केली जाईल. आणखी दोनशे एकर जमिनीचे भूसंपादन प्रस्तावित आहे.