सातारा – ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर कोणत्याही सुविधा नसताना आनेवाडी येथील टोल वसुलीवर सातारकरांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी आक्षेप नोंदवला आहे. सातारकरांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली.
साताऱ्यातील पन्नास नागरिकांनी पुढाकार घेत याबाबतचे निवेदन प्रशासनाला सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, आशियाई महामार्गावर प्रवासी व वाहनचालकांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने खेड शिवापूर व आनेवाडी या टोल नाक्यांवरील टोल वसुली थांबवण्यात यावी. उत्तम रस्ते, प्रसाधनगृहे, रुग्णवाहिका, पथदिवे, परावर्तक अशा कोणत्याही सुविधा चारपदरी व सहापदरी रस्त्याच्या कामाच्या वेळी पुरवण्यात आलेल्या नाहीत. तीन वर्षे होऊनही बऱ्याच ठिकाणी उड्डाण पूल अर्धवट आहेत.
काही ठिकाणी मुख्य रस्ता सोयीप्रमाणे वळवण्यात आला आहे. रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून सेवा रस्त्यांचीसुद्धा वाट लागली आहे. सातारा-पुणे आणि पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या
प्रवाशांना टोल भरून पाच तास मन:स्ताप सहन करावा लागत आहे. कोणत्याही सुविधा न
पुरवता पथकर आकारण्याचा अधिकार रस्ते महामार्ग प्राधिकरणाला नाही. या लूटमारीविरुद्ध कोणीही आवाज उठवत नसल्याचा फायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. हा महामार्ग त्रुटींपासून मुक्त होईपर्यंत पथकर बंद करावा अन्यथा या आर्थिक शोषणाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल. निवासी उपजिल्हाधिारी सुनील थोरवे यांना देण्यात आलेल्या निवदनावर दीडशे नागरिकांच्या सह्या आहेत.