केंद्र सरकारची महत्वपुर्ण घोषणा
नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट असलेल्या अनिवासी भारतीयांना त्यांचे आधार कार्ड बनवण्यासाठी अनेक समस्यांना आजपर्यंत सामना करावा लागत होता. परंतु, आता यासर्व कटकटीपासून अनिवासी भारतीयांची सुटका होणार आहे. कारण यापुढे अर्ज दाखल केल्यानंतर लगेच अनिवासी भारतीयांना आधार कार्ड मिळू शकणार आहे. याविषयीची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
अनिवासी भारतीयांना आपले आधार कार्ड मिळवण्यासाठी आता 180 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. उलट, अनिवासी भारतीयांना आता तत्काळ प्रभावाने आधारकार्ड मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अनिवासी भारतीयांना त्वरित आधार कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची अधिसूचनाही जारी केली आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, एनआरआय लोकांना भारतात आल्यावर आधार कार्ड मिळू शकेल. तथापि, हा नियम वैध भारतीय पासपोर्ट असणाऱ्या अनिवासी भारतीयांनाच लागू असणार आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या अधिसूचनेत असेही नमूद केले आहे की अधिसूचना जारी झाल्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून हा नियम त्वरित लागू होणार आहे.