इस्लामाबाद,- पाकिस्तानातील इम्रान खान सरकारची चारही बाजूने कोंडी झाल्यामुळे सरकार चर्चेची भीक मागत आहे. मात्र आता त्यांच्याशी चर्चा केली जाणार नसल्याचे विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्या मरियम नवाज यांनी म्हटले आहे.
संसदेचे कामकाज चालावे अशी सरकारची इच्छा होती. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीशी चर्चा करण्यासाठी सरकारने तीन सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ स्थापन केले होते. मात्र पहिल्या टप्प्यातील चर्चेनंतरच विरोधी पक्षांनी आता माघार घेतली आहे. इम्रान सरकारची चहुबाजूने कोंडी झाल्यामुळे सरकार आता वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुस्लिम लीगच्या नेत्या असलेल्या मरियम नवाज यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांशी कोणत्याही स्तरावर चर्चेची आमची तयारी आहे. मात्र आता सरकारशी यापुढे चर्चा केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षांचे सगळेच नेते संसदेच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या सध्या या विषयावर आमची चर्चा सुरू आहे. राजीनामा दिल्यानंतर एक महामोर्चा काढला जाण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
दरम्यान, बलूच अधिकारांसाठी लढणाऱ्या करिमा बलोच यांचा काही दिवसांपूर्वीच कॅनडा येथे संशयास्पद मृत्यू झाला. करिमा बलोच यांच्या पार्थिवाचा अनादार करण्यात आल्याची टीकाही विरोधी पक्षांनी सिनेटमध्ये सरकारवर केली. करिमा यांच्या मृत्यूस पाकिस्तानची गुप्तचर संस्थाच जबाबदार असल्याचा आरोप केला जात असून करिमा यांच्या कुटुंबियांना बंधक बनवून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची टीकाही सरकारवर केली जाते आहे.