जुन्नरमधील 17 ग्रामपंचायतींच्या मोर्चेबांधणीला वेग
बेल्हे : जुन्नर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींची निवडणुकीचा बिगूल वाजल्याने गाव पुढारी कामाला लागले आहे. ऐन हिवाळ्यात या गावांमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असल्याने त्या दृष्टीने या निवडणुका महत्वपूर्ण ठरणार आहे. जुन्नर तालुक्यातील काळवाडी, झापवाडी, सोमतवाडी, सावरगाव, साकोरी तर्फे बेल्हे, आणे, पारगाव तर्फे आळे, सुलतानपूर, बोतार्डे, हिरवे तर्फे मीन्हेर, आंबे, हातवीज, वानेवाडी, भिवाडे खुर्द, विठ्ठलवाडी (येणेरे), काले व शिंदे या 17 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.
ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आता सरपंचपद थेट जनतेतून निवडणार असल्याने सरपंच पदासाठी कोण उमेदवार असणार याचीच उत्सुकता नागरिकांना लागली आहे. तसेच उमेदवार कोण द्यायचा यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये गुप्त खलबतांसह बैठका सुरू असल्याची माहिती आहे.
या ग्रामपंचायतींसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे उमेदवार फायनलसाठी या गावांमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये बैठकांना वेग यायला सुरुवात झाली आहे. राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी समजली जाते. ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व गावपातळीवर पकड मजबूत करण्यासाठी गाव पुढाऱ्यांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधीं कडूनही या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहिले जाते.
भाजप-शिवसेना या युती सरकारच्या काळात सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2019 पर्यंत जिल्ह्यातील सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली. मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आले. या सरकारने थेट निवडीचा निर्णय रद्द केला. भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. त्यांनी पुन्हा सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला.
प्रतिस्पर्ध्याला शह
इच्छुकांनी आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेणे, वाढदिवस, शुभ कार्य आणि इतर कार्यामध्ये सक्रियता दर्शवत आपण किती अग्रेसर आहोत हे दाखवत आहेत. तसेच आपला प्रतिस्पर्धी किती दुबळा आहे, आपण त्यापेक्षा किती अग्रेसर आहोत असे मतदारांना भासवत आहेत. तर काही ठिकाणी आतापासूनच काहीजण मतदारांना लक्ष्मीदर्शन घडवत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणाचा धुव्वा उडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.