इस्लामाबाद,/ लाहोर – भारतातील चुकीची गोष्टीवर बोट ठेवलं किंवा पाकिस्तानविषयी काही बोललं की, राजकीय पुढारी पाकिस्तानात जाण्याची टीका करत होते. आता पाकिस्तानमध्ये देखील असंच काहीसं चित्र असून तिथं पंतप्रधान इम्रान खान यांना विरोधकांनी भारतात जाण्याची सल्ला दिला.
भारताची स्तुती केल्याबद्दल पाकिस्तानच्या विरोधी नेत्या मरियम नवाझ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जर इम्रान खान यांना भारताबद्दल एवढे प्रेम असेल, तर त्यांनी भारतातच जावे, असे मरियम यांनी म्हटले आहे.
भारतामध्ये कोणत्याच पंतप्रधानाने अविश्वास ठरावाला सामोरे जाताना संविधानाचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे इम्रान खान यांनी भारताचेच अनुकरण करायला पाहिजे, असे मरियम म्हणाल्या. काल इम्रान खान यांनी देशाला उद्देशून भारताचे कौतुक केले होते. त्यामुळे मरियम यांनी इम्रान यांच्यावर ही टीका केली.
काल देशवासियांना संबोधित करताना इम्रान यांनी भारताविषयी बोलताना आपण भारताचे शत्रू नाही. भारतामध्ये आपले अनेक चाहते असल्याचे म्हटले होते. जगातील कोणतीही महासत्ता भारताला भारताच्या हिताविरुद्ध काहीही करायला भाग पाडू शकत नाही. रशियावर निर्बंध असले, तरी भारत रशियाकडून तेल विकत घेत आहे.
भारताला कोणी धमकावू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले. युरोपीय संघाचे राजदूत जे पाकिस्तानबद्दल बोलले, ते भारताविषयी बोलू शकतील का? ते बोलू शकणार नाहीत, कारण भारत सार्वभौम देश आहे, असे इम्रान खान म्हणाले होते. गेल्या आठवड्यातही इम्रान खान यांनी स्वतंत्र परदेश धोरणाबद्दल भारताचे कौतुक केले होते.