मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास 7 ते 8 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यातच येत्या काही दिवसात मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना सांगितले आहे की, कोरोना बाधित रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. मात्र घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा देतानाच नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा, अशी सूचनाही त्यांनी मुंबईकरांना दिली आहे. लोकांनी ठरवावे त्यांना लॉकडाऊन हवे का? असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.