नवी दिल्ली: करोना संकटाच्या काळात अनेक अडचणी आणि अडथळे निर्माण झाले आहेत. बऱ्याच क्षेत्रांना त्याचा फटका बसला असून रिअल इस्टेट क्षेत्राचाही त्यात समावेश आहे किंबहुना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे क्षेत्र बॅकफुटवरच आहे. मात्र असे असले तरी या संकटाच्या काळात ग्राहकांना चांगली संधी निर्माण झाली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जे नव्या घराच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी आता उत्तम संधी आहे. तसेच आताच्या काळात मालमत्तेच्या किमती अजुनही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. देशात पहिल्यांद गृहकर्जाचा व्याजदर सात टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. मालमत्तेच्या किंमतीही गेल्या पाच वर्षाच्या काळात इतक्या कमी झाल्या आहेत.
खरेदीदार या काळात सरकारच्या टॅक्स बेनिफिट योजनेचा लाभ घेउ शकतात. ज्यांच्यापुढे कोणतेही आर्थिक संकट नाही, ते गुंतवणुकीसाठी अथवा स्वत:च्या राहण्यासाठी गृहखरेदी करू शकतात. देशातल्या सात प्रमुख शहरांत सध्या 15.92 लाख घरे निर्मिती अवस्थेत आहेत, अर्थात त्यांचे बांधकाम सुरू आहे. ही घरे लवकरच तयार होणार असून त्यांच्या विक्रीवर बांधकाम व्यावसायिकांचा भर असणार आहे.
बिल्डर लोकांनी अगोदर तयार घरे विकण्यास प्राधान्य द्यावे, त्यानंतर नव्या योजनांचा विचार करावा असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या प्रमुखांनीही काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितले होते. तज्ञांच्या मते बांधकाम सुरू असलेल्या घरांपेक्षा तयार घरांच्या खरेदीला नागरिक सध्या प्राधान्य देत आहेत. करोनाच्या काळात लोकांना जास्त जोखिम पत्करायची इच्छा नाही. तसेच निर्माणाधीन घरांपेक्षा पूर्णावस्थेत असलेले घर सध्याच्या काळात अधिक फायदेशीर आणि किफायतशिर आहे. ज्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत, त्या व्यावसायिकांना मजुरांचा तुटवडाही भेडसावतो आहे.
लॉकडाउनच्या काळात सरकारने श्रमिक एक्सप्रेस सुरू केल्याने अनेक स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतले आहेत. त्याच्या फटक्याचा सामना बिल्डरांना करावा लागतो आहे. एकीकडे बॅंकांचे हप्ते, मंदावलेली विक्री आणि खरेदीदार पुढे
येण्यास तयार नाहीत अशा तिहेरी अडचणीत ते सापडले आहेत.
त्यामुळे हात मोकळे करण्यासाठी ग्राहकांना मोठा डिस्काउंट देण्याचीही त्यांची तयारी आहे. याचाच अर्थ कमी झालेले व्याजदार आणि बिल्डरकडून मिळणारा डिस्काउंट याचा लाभ ग्राहक घेउ शकतात.त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर खरेदी केल्यास सरकारतर्फे मोठी सवलतही दिली जात आहेत. 31 मार्च 2020 रोजी या योजनेची मुदत संपली होती. मात्र करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यालाही 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आर्थिक चित्र स्पष्ट असणाऱ्यांसाठी आताच्या काळात घर खरेदी करणे हा फायद्याचा सौदा ठरू शकतो असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.