चीनने भारतीय हद्दीत केलेल्या आक्रमणाचा विषय राहुल गांधी आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांनी जोरदारपणे लावून धरल्यामुळे भाजपची मोठीच कोंडी झाली होती. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने नेहमीच्या शैलीने विषयांतर करीत भलत्याच विषयावरून काहूर माजवायला सुरुवात केली. “राजीव गांधी फाउंडेशन’ला 20 वर्षांपूर्वी मिळालेल्या देणग्यांचा विषय त्यांनी उकरून काढला. पण त्याच्या प्रत्युतरात कॉंग्रेस नेत्यांनी मोदींच्या “पीएम केअर्स’ या खासगी फंडाला चिनी कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांचा विषय आकडेवारीनिशी उपस्थित केल्याने भाजपचीच पुन्हा कोंडी झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
देणगी या विषयाचे आपल्यावरच इतके बुमरॅंग होईल, असे भाजपला वाटले नसावे. याचा दोष थेट भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर जातो. कॉंग्रेसने हा विषय चौफेर लावून धरल्याने भाजप कधी नव्हे ती सध्या नामोहरम झाल्यासारखी दिसते आहे. मुळात वीस-वीस वर्षांपूर्वीचे जुने विषय काढून देशापुढील सध्याच्या मूळ समस्यांना बगल देण्याची सरकारी पक्षाची ही कृतीच अनाकलनीय होती. “राजीव गांधी फाउंडेशन’ला सरकारी कोषातून 20 लाखांची देणगी दिली गेली हा विषय आज उपस्थित करण्यामागे केवळ चीन विषयावरून लोकांचे लक्ष अन्यत्र विचलित करण्याखेरीज दुसरा कोणताच हेतू नव्हता हे स्पष्ट आहे.
“राजीव गांधी फाउंडेशन’ने म्हणे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडूनही निधी घेतला आहे, असा मुद्दा भाजपकडून पुढे करण्यात आल्यानंतर कॉंग्रेसच्या वतीनेही त्याला अत्यंत चोख प्रत्त्युतर दिले गेले आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील “पीएम केअर्स फंडा’ला चीनच्या शाओमी कंपनीकडून 10 कोटी, टिकटॉक कंपनीकडून 30 कोटी, ओप्पोकडून 1 कोटी, वनप्लस कंपनीकडून 1 कोटी, ह्युओई कंपनीकडून 7 कोटी अशा देणग्या मिळाल्याचे सांगितले जात आहे. हे खरे आहे काय, असा प्रश्न कॉंग्रेसने भाजप सरकारला विचारला आहे.
पेटीएम या चिनी कंपनीनेही “पीएम केअर्स फंडा’ला तब्बल शंभर कोटी रुपयांची देणगी दिली आहे, ते खरे आहे काय, असा सवाल कॉंग्रेसने विचारला आहे. त्याला सरकारकडून अजून उत्तर आलेले नाही. मुळात “पीएम केअर्स’ हा फंड सरकारी नाही, तो सरकारी असल्याचे भासवले गेले असले तरी तो एक खासगी निधी आहे. त्या फंडला चिनी कंपन्यांकडून देणग्या घेणे गैर नाही काय, या प्रश्नावर भाजपकडे काय उत्तर आहे ते ऐकण्यास आता लोक उत्सुक आहेत.
जे. पी. नड्डा यांनी मग चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा आणि गांधी परिवाराचा काय संबंध आहे, असा दुसरा मुद्दा उपस्थित करून चिनी नेत्यांच्या गांधी परिवाराशी झालेल्या भेटीचे फोटो त्यांनी प्रकाशित केले आहेत. हा मुद्दाही भाजपच्याच अंगलट आला. कारण खुद्द भाजपच्याच तीन राष्ट्रीय अध्यक्षांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या निमंत्रणावरून चीनचे कसे दौरे केले याचा तपशील सादर करून कॉंग्रेसने भाजप नेत्यांचे चीनशी नेमके काय संबंध आहेत, असा उलट प्रश्न उपस्थित करीत भाजपला पुन्हा कोंडीत पकडले आहे.
काल या संबंधात दिल्लीत कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा तपशील सादर केला. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार भाजप नेते राजनाथसिंह हे जानेवारी 2007 आणि ऑक्टोबर 2008 ला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या निमंत्रणावरून तिकडे गेले होते. नितीन गडकरी हे जानेवारी 2011ला चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर सन 2014 मध्ये अमित शहांनी भाजप आमदारांचे शिष्टमंडळ चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या निमंत्रणावरून तिकडे पाठवले होते.
एवढेच नव्हे तर खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर गेले होते, असा कॉंग्रेस नेत्यांचा दावा आहे. हा सगळा तपशील भाजपलाच गोत्यात आणणारा ठरला आहे. वास्तविक हा काही सध्याच्या घडीला तावातावाने चर्चा करावा असा विषय नाही. पण लोकांचे लक्ष अन्यत्र विचलित करण्यासाठी असे भलतेसलते विषय नको त्या वेळी उपस्थित करण्याची भाजपला जी सवय लागली आहे त्याचाच हा परिणाम आहे.
आपण उपस्थित करीत असलेले मुद्दे आता आपल्याच अंगलट येत चालले आहेत हे आता भाजप नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. मुळात चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला, त्यांच्या आक्रमणात वीस भारतीय जवान शहीद झाले, या मुद्द्याचा प्रतिवाद म्हणून “राजीव गांधी फाउंडेशन’ने वीस वर्षांपूर्वी घेतलेली 20 लाखांची देणगी हे उत्तर असू शकते काय, याचा विचार भाजपच्या नेतृत्वानेच करायला हवा होता. त्यांनी काहीही आरोप करायचे आणि विरोधकांनी मूग गिळून ते निमूटपणे सहन करायचे, असे होणार नाही.
भाजपच्या या आरोपांतील फोलपणा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अत्यंत संयमित शैलीत उघड केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “राजीव गांधी फाउंडेशन’ने घेतलेली ही कथित देणगी परत दिल्यानंतर चीन आपल्या भारतीय हद्दीतून माघारी फिरणार आहे काय? त्यावर भाजप नेत्यांकडे उत्तर नव्हते. हा सगळा विषय अंगलट आल्यानंतर आता अमित शहांनी देश संकटात असताना असले उथळ राजकारण करणे दु:खदायक आहे, अशी भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांचा चीनला लाभ होतो आहे, असेही अमित शहा यांचे म्हणणे आहे. मग असे असेल तर चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमणच केलेले नाही हे खुद्द पंतप्रधानांनीच केलेले वक्तव्य चीनच्या पथ्यावर पडणारे नाही काय, याचेही उत्तर अमित शहांना द्यावे लागेल.
मोदींच्या या वक्तव्यामुळे चीनचे निर्दोषत्व आपोआपच सिद्ध होते आहे. मोदींनी चीनला निर्दोष ठरवण्याची इतकी घाई का केली आणि मुळात वस्तुस्थिती तशीच आहे काय, या प्रश्नांची उत्तरे देशाला मिळायला हवीत, ही अपेक्षा चुकीची मानता येणार नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना आता सुचवावे लागेल की, हा केवळ तुमच्या राजकीय संघर्षाचा विषय नाही. हा संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा विषय आहे.
त्यामुळे कोणतेही अनाकलनीय मुद्दे पुढे करून त्याच्या आरोप-प्रत्यारोपात वेळ घालवण्याऐवजी चीनचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी जितके राजकीय मतैक्य साधणे शक्य आहे तितके त्यांनी ते साधले पाहिजे. हीच काळाची गरज आहे.