मुंबई – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. याशिवाय वाहन चालकांची कसून चौकशी करत आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालक सर्व नियमांचं पालन करत आहेत का? याकडे पोलिसांकडून अत्यंत बारकाईने लक्ष दिले जात आहे. मात्र, पोलिसांच्या या कारवाईमुळे दहिसर टोल नाक्यावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पोलिसांच्या नाकाबंदीमुळे दहिसर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर मुंबईत हळूहळू काही उद्योग, व्यवसाय, खासगी कार्यालये सुरु होत आहेत. मुंबई उपनगर, दहिसर, भाईंदर, ठाणे या भागातील शेकडो नागरिक कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेला जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. या सर्व वाहनांची पोलीस तपासणी करत आहेत.
मुंबईत करोनाचं मोठं संकट आहे. फक्त राज्यातच नव्हे तर देशभरातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं जरुरीचं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.