मंचर : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कोठे गेले याची चिंता न करता आता निष्ठावंत सैनिकांनी अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहावे. आता खऱ्या अर्थाने पक्षाला चांगले दिवस येतील, अशी खोचक टीका शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख विजया शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली.
शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर मंचर (शेवाळवाडी, ता. आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडी येथे मंगळवारी (दि. 19) निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला, त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, माजी जिल्हाप्रमुख ऍड. अविनाश राहणे, सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले, जुन्नरचे संभाजी तांबे यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
अविनाश राहणे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी राहणे त्यांना ताकद देणे हे प्रत्येक शिवसैनिकांचे कर्तव्य आहे. अनेकजण स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करतात. स्वतःची सोय पाहण्यासाठी इतर पक्षात जाण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. निष्ठावंत शिवसैनिक कधीही डगमगणार नाही. आव्हान स्वीकारण्याची त्याच्यामध्ये हिम्मत आहे, त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी हरकत नाही.
राजाराम बाणखेले म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील यांना गेली 15 वर्षे शिवसैनिकांनी मेहनतीने मोठ्या मताधिक्याने लोकसभेसाठी खासदार केले. ते पक्ष सोडून गेले असले तरी निष्ठावंत शिवसैनिकांवर कोणताही परिणाम होणार नाही. अधिक जोमाने यापुढे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
पक्ष अडचणीत असताना पक्षाला ताकद देणे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे म्हणून आम्ही निष्ठावंत शिवसैनिक जागेवरच थांबलो आहे. आपण पक्षासाठी काय करू याचा सर्वाधिक विचार निष्ठावंत शिवसैनिकांनी करावा.
– सुरेश भोर, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना