नवी दिल्ली -शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांत राजपूत यांच्याबाबत केलेल्या विधानांसाठी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर न्यायलयात दावा दाखल करण्याचा इशारा त्याच्या कुटुंबीयांनी दिला आहे. अत्यंत तीव्र शब्दात आपल्या भावना मांडणारे नऊ पानी निवेदन राजपूत कुटुंबीयांतर्फे प्रसिद्ध करण्यात आले.
सुशांत सिंह राजपूत यांच्या कथित आत्महत्येचा मुद्दा भारतीय जनता पक्ष राजकारणाचा मुद्दा बनवत आहे. त्याच्या घटनेचा क्रम पाहता ही कोणी तरी लिहिलेली पटकथा असावी, असा संशय येतो, असे राऊत म्हणाले होते. सुशांत आणि त्याच्या वडिलांचे संबंध ताणले गेले होते.
ही घटना घडल्यानंतर 40 दिवसांनी त्याचे वडील बिहार पोलिसांकडे का गेले होते? असा सवाल त्यांनी केला होता. मुंबई पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. त्यानंतर त्यावर प्रश्नचिन्ह उभे करा, असेही ते म्हणाले होते. आपल्या वडिलांच्या दुसऱ्या विवाहाने सुशांत नाखूश होता. त्याचे वडिलांशी संबंध चांगले नव्हते, या विधानाबद्दल राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करणारी नोटीस सुशांतचा भाऊ नीरज बबलू यांनी बजावली आहे.