– महेश कोळी
अंतराळातील वाढता कचरा हा संकटाचे कारण ठरत आहे. कारण, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची टांगती तलवार असते. त्यामुळे हा कचरा तातडीने हटविण्याबाबत वेगाने मोहीम राबविण्याची गरज आहे.
जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणाऱ्या कचऱ्याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेट्सचे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात कचरा निर्माण करण्यास हातभार लावताहेत. यादृष्टीने भारतीय अवकाश संशोधकांनी देखील दमदार यश मिळवले आहे. अंतराळातील कचरा स्वच्छ करण्यासाठी अनेक देशांतील शास्त्रज्ञही काम करत आहेत. अवकाशातील या संकटाने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच वेळेत पावले उचलणे महत्त्वाचे आहे.
पृथ्वीवरच्या वाढत्या कचऱ्यामुळे प्रदूषणाला आणि पर्यावरणाला हानी निर्माण होत असताना अंतराळातील कचरा देखील डोकेदुखी ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जगातील बहुतांश देशांकडून अवकाशात उपग्रह सोडले जात आहेत. पण एखाद्या उपग्रहाने कालावधी पूर्ण केल्यानंतर त्या उपग्रहाचे पुढे काय होते, याबाबत अनेकांना माहिती नसते. प्रत्यक्षात एक तर हे उपग्रह अंतराळात भरकटत राहतात किंवा समुद्रात येऊन पडतात. अशा उपग्रहांची विल्हेवाट लावण्यासाठी जगभरातील अनेक नामांकित अंतराळ संस्था अहोरात्र प्रयत्न करत असून यात भारतही मागे नाही. काही दिवसांपूर्वीच अंतराळातील वाढता कचरा कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)च्या शास्त्रज्ञांनी यशस्वी प्रयत्न केले.
“इस्रो’ने उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही-सी 56) ला प्रक्षेपित करून सिंगापूरच्या सात उपग्रहांना अवकाशातील वरच्या कक्षेत स्थापन केले. हे उपग्रह स्थापित झाल्यानंतर त्याबरोबरच्या रॉकेटच्या निरुपयोगी भागांना 300 किलोमीटरपर्यंत खालच्या कक्षेत आणण्यात इस्रोला यश आले. यामुळे “स्पेस जंक’ कमी करण्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे. तसेच अंतराळातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उपग्रहांच्या कार्यातील अडथळेही दूर होणार असल्याने त्यांची कार्यक्षमताही वाढण्यास हातभार लागणार आहे.
“पीएसएलव्ही’ चार भागात विभागलेले रॉकेट असून त्यात पहिले तीन भाग लक्ष्य साधल्यानंतर समुद्रात पडतात आणि शेवटचा भाग पीएस-4 हा उपग्रहास अंतराळाच्या कक्षेत स्थापित केल्यानंतर स्वत: कचऱ्यात परावर्तित होतो आणि तो अवकाशात वरच्या भागात प्रदक्षिणा करत राहतो. या कामात इस्रोने वेगळेच यश मिळवले. यानुसार रॉकेटचा हा भाग खालच्या कक्षेत जातो आणि याप्रमाणे तो वरच्या भागातील उपग्रहांच्या मार्गात येत नाही. अंतराळातील कचरा नैसर्गिक रूपाने कमी करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. या यशासह भारताने अंतराळातील कचरा कमी करण्याची जबाबदारी बिनचूकपणे पाडली. न्यू स्पेस इंडियाचे अध्यक्ष डी. राधाकृष्णन म्हणाले, की भारताला अंतराळातील कचरा कमी करण्यात मिळालेले यश पाहिले तर त्यापेक्षा आणखी चांगले यश कोणाला मिळेल, असे वाटत नाही.
पृथ्वीच्या चोहोबाजूंनी सध्या दोन हजार उपग्रह प्रदक्षिणा घालत आहेत. त्याचवेळी तीन हजारांपेक्षा अधिक निष्क्रिय उपग्रह हे कचरा वाढविण्यास आणि नव्याने प्रक्षेपित होणाऱ्या उपग्रहाच्या कामात अडथळा आणत आहेत. परिणामी त्यांची टक्कर होण्याचीच भीती अधिक आहे. शिवाय अवकाशातील कचरा हा सुमारे 34 हजार तुकड्यांत असून त्याचा आकार हा दहा सेंमीपेक्षा अधिक आहे. एवढेच नाही तर लाखो तुकडे हवेत तरंगत आहेत आणि ते एखाद्या वस्तूला धडकले तर मोठी हानी देखील होऊ शकते. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर स्पेस रॉकेटचा कचरा आढळून आला. तो भारतीय रॉकेटचा निरुपयोगी सुटा भाग असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच अवकाशातील उपग्रहांचा कचरा हा कालांतराने जगासाठी संकट निर्माण करू शकतो. ते कोणत्याही क्षणी पृथ्वीवर कोसळू शकतात. 2016 मध्ये सहा टन वजनाचा यूआरए उपग्रह पृथ्वीवर पडला.
1989 मध्ये शंभर टन वजनाचा स्कायलॅब उपग्रह हिंद महासागरात पडला. 2001 मध्ये रशियाचे अंतराळ स्थानक मीर दक्षिण प्रशांत महासागरात पडले. अर्थात, अंतराळातील अभियानाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत जेवढे तुकडे आदळले, त्यातून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण भविष्यात जीवित आणि वित्तहानीची शक्यता नाकारता येत नाही. यादृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कालावधी पूर्ण केलेल्या उपग्रहांना परत आणण्याचे अभियान सुरू केले आहे. या क्रमवारीत शास्त्रज्ञांनी उपग्रह मेघा-ट्रापिक्स-1 (एमटी) चे अवघड अभियान पूर्ण करत त्यास पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणत प्रशांत महासागरात पाडले. या यशाबाबत इस्रोने म्हटले, की या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि त्याचे हिंद प्रशांत महासागरावर विघटन केले. याशिवाय भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्र (ए-सॅट) ची निर्मिती आणि यशस्वी चाचणी केली आहे. या चाचणीत एका निकामी उपग्रहाला नष्ट केले.
अंतराळात मोठ्या संख्येने रॉकेट, उपग्रहांची उपकरणे, सुटे भाग कचऱ्याच्या रूपात फिरत आहेत. त्याची संख्या सुमारे 9 लाख आहे. सरासरी 25 ते 28 हजार किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने निष्क्रिय उपग्रह, उपकरणे, तुकडे पृथ्वीच्या कक्षेत (एलईओ) फेऱ्या मारत आहेत. अर्थात, वातावरणात प्रवेश केल्यानंतर हे तुकडे पूर्णपणे जळून जाणे अपेक्षित आहे. त्यांना केवळ क्षेपणास्त्राद्वारेच नष्ट करता येणे शक्य आहे. मानवनिर्मित कचरा साफ करण्यासाठी जपानची “जाक्सा’ आणि अमेरिकेच्या नासासारख्या कंपन्या काम करत आहेत. अनेक देशांच्या खासगी कंपन्या या क्षेत्राकडे भविष्यातील व्यवसाय म्हणून पाहात आहेत. भारताने या दृष्टीने आघाडी घेत एमटी 1 नष्ट करून इतिहास घडविला.
अंतराळातील वाढत्या कचऱ्याला वेळीच नष्ट केले नाही तर हा कचरा भविष्यात हवा, पाणी आणि पृथ्वीसाठी मोठे संकट ठरू शकते. जपानची कंपनी “ऍस्ट्रोस्केल’चे सीईओ नोबू ओकोडा यांच्या मते, आम्ही 22 मार्च 2020 मध्ये कझाकिस्तानच्या बाइकोनूर येथूून सोयूज रॉकेटच्या मदतीने “एल्सा डी’ उपग्रह सोडला आणि त्या माध्यमातून अवकाशातील कचरा हटविण्याचे अभियान सुरू केले. खराब उपग्रह आणि यानाचा कचरा बाजूला करण्याचे काम केले जात आहे. जपानचा दुसरा उपग्रह जाक्सा हायइलेक्ट्रोडायनॅमिक हे प्रदक्षिणा करणाऱ्या कचऱ्याच्या वेगाला आवर घालेल आणि कालांतराने त्यास पृथ्वीच्या वातावरणात ढकलून देण्यात येईल. जर्मनीची अंतराळ कंपनी डीएलआरने देखील कचरा नष्ट करण्यासाठी लेसर तंत्रज्ञान विकसित केले. अमेरिकेची कंपनी नासाने इलक्ट्रो नेट तयार केले आहे.
हे एकप्रकारचे जाळे असून ते कचऱ्याला एकत्र बांधून पृथ्वीच्या वातावरणात आणण्याचे काम करेल. पृथ्वीच्या वातावरणात येताच बहुतांश कचरा हा आपोआप जळून नष्ट होणे अपेक्षित आहे. अमेरिकेत सहापेक्षा अधिक स्टार्टअप कंपन्या याच अभियानाशी निगडीत काम करत आहेत. या जोडीला अंतराळ शास्त्रज्ञ हे अंतराळातील कचरा हा पुन्हा कसा उपयोगात आणता येईल यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. या दृष्टीने स्वित्झर्लंडच्या शास्त्रज्ञांनी “क्लिन स्पेस वन’ नावाचा उपग्रह तयार करण्याची घोषणा केली आहे. हे उपाय मौल्यवान उपग्रहांची धडक टाळण्यासाठी केले जात आहेत.