प्रत्येक पालकाला आपले मूल संस्कारक्षम व्हावे असे वाटते. त्यासाठी बरेच पालक आपल्या मुलांना संस्कार वर्गाच्या शिकवणुकीला पाठवत किंवा सुट्ट्यांमध्ये पाल्यांचे संस्कार शिक्षण पूर्ण करून घेतात. खरंच संस्कार करण्याचा काही ठरावीक काळ असतो का? संस्कार करण्यासाठी वेळेचे बंधन असते का? संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे. मग हे संस्कार आठवड्यातून एक किंवा दोन वेळा क्लास लावून करणे कसे शक्य होईल?
सामाजिक व वैयक्तिक स्वास्थ्याकरिता संस्कार हे महत्त्वाचे. आपले मूल जर संस्कारित व्हावे असे पालकांना वाटत असेल तर मुलांमध्ये जीवन कौशल्याचा विकास करणारी दृष्टी सजग पालकांमध्ये असायला हवी. संस्कार हे बालवयातच चांगल्या प्रकारे रुजले जातात व ते आयुष्यभर टिकतात. म्हणूनच सजग पालकांनी मुलांना फक्त वाढविण्यापेक्षा घडविण्यावर भर द्यावा. त्यासाठी बालवयातच त्यांना स्वावलंबी बनवावे. त्यांना शक्य असतील ती कामे करू द्यावीत.
लहान मुलांनी काय करू नये हे आपण त्यांना सांगतो; परंतु काय करावे हे त्यांना सांगत नाही किंवा त्यासाठी त्यांना आपण वेळही देत नाही. हे वेळ देणे म्हणजे नक्की काय? काहीतरी निमित्ताने पाल्य आपल्या सहवासात राहणे म्हणजे त्याला वेळ देणे होय व त्याला आपला सहवास आवडण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करणे होय. परिस्थितीनुसार आपल्या पाल्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यापेक्षा, परिस्थितीचा प्रत्येक प्रसंगाचा आपल्या पाल्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वापर करा. कारण वेळ देऊन साकारलेली कोणतीही गोष्ट अप्रतिम आनंद देते. काही पालक लहान वयातच मुलांना “ट्युशन’ लावतात. त्यापेक्षा मुलांचा अभ्यास तुम्ही स्वतः घ्या. मुलं तुमच्या सहवासात राहतील. त्यांच्याबरोबर बुद्ध्यांक वाढवणारे खेळ खेळा. आपल्या प्रत्येक कामात त्यांना विनाकारण लुडबूड करू द्या. व्यायाम करताना, बाजारात जाताना, स्वयंपाक करताना त्यांना सोबत असू द्या. तरच त्यांच्या जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा विकास होईल.
हे शिक्षण व अनुभव कोणत्याही पुस्तकातून, शाळेतून किंवा ट्युशनमधून दिले जात नाही. मुलांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करा. त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करा; परंतु अति लाड करणे टाळा. तुम्ही केलेल्या कष्टाची त्यांना वेळोवेळी जाणीव करून द्या. मुले ही अनुकरणप्रिय असतात. म्हणून
स्वतःचा आदर्श मुलांसमोर ठेवा. आई-वडिलांचा आदर करणे, प्रत्येकाशी प्रेमाने वागणे, मोठ्यांना नमस्कार करणे असे मुलांना फक्त सांगण्यापेक्षा आपण स्वतः तसे वागावयास हवे तर मुले आपल्या चांगल्या वर्तणुकीचे अनुकरण करतील. तसेच घरातील कामाचे वाटप करताना मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नये. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये त्यांच्या समवयस्कांचाही वाटा असतो. म्हणून आपल्या पाल्यांना शाळेमध्ये व समाजामध्ये वावरताना इतर मुलांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची सवय लावावी.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचे वागणे, कुटुंबातील शैक्षणिक, निरोगी व अध्यात्मिक वातावरण या सर्वांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर परिणाम होत असे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तसेच जास्त नातेवाईक असणाऱ्या कुटुंबामध्ये मुलांना जगण्याची कला शिकण्यासाठी जास्त वाव असतो. वेगवेगळ्या व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या आयुष्यातील चांगले, वाईट अनुभव, प्रसंग इत्यादी जवळून अनुभवायला मिळतात व त्यांच्या या अनुभवाचे संस्कार कळत नकळत मुलांच्या मनावर होत असतात. सामाजिक कौशल्यांचा विकासही कुटुंबांमध्ये होत असतो.
निसर्गप्रेम, स्वच्छता, टापटीपपणा, श्रमप्रतिष्ठा, सहकार्याची भावना यासारख्या मूल्यांची रुजवणूक होऊ शकते; परंतु या सर्व परिस्थितीचा पालकांनी चाणाक्षपणे वापर करून द्यायला हवा. आनंदाच्या प्रसंगी खळखळून हसायला यायला हवे तसेच दुःखाच्या प्रसंगात घळघळून रडायला यायला हवे. कोणत्याही भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त व्हायला हव्यात. साने गुरुजींच्या मते- ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत ती माणसे म्हणायची?
बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास यथायोग्य व नैसर्गिकपणे होण्यासाठी कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. पुस्तकी ज्ञानातून हा विकास होईलच असे नाही. पालकांना याची जाणीव असावी. किशोरवयात पदार्पण करणाऱ्या मुला-मुलींच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या मानसिकतेला योग्य वळण देणे सजग पालकांचे कर्तव्य होय. या वयामध्ये काहीतरी कळायला लागलेलं असतं पण नीट आकलन होत नसतं. त्यामुळे वेगळं काहीतरी करण्याचे धाडस, कुतूहल, संकोच, अनामिक भय अशा संमिश्र भावनामध्ये हे वय अडकलेले असतं.
“दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’, असे हे वय असले तरी शरीरातील हार्मोन्स बदलामुळे ज्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये बदल होतो त्याचप्रमाणे त्यांच्या मानसिकतेतही बदल होत असतो. अशावेळी त्यांना वडीलधाऱ्या माणसांचा आधार वाटतो; परंतु सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील मुलांना वेळ देत नसल्याने मुले जास्तीत जास्त मोबाइल व टीव्हीच्या आहारी गेलेली दिसतात. म्हणूनच या वयात पालकांनीच त्यांचे मित्र बनायला हवे. या वयात मुले विचित्र मानसिक परिस्थितीतून जात असल्यामुळे अशा वेळी त्यांना मानसिक आधार द्यावा. वाढत्या वयात शरीराला जास्त पोषक आहाराची गरज असते. शरीराचे योग्य पोषण झाले तरच त्यांच्या वजन व उंचीत अपेक्षेप्रमाणे वाढ होईल. किशोरवयीन मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आलेली व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळांना उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे.
– प्रविण गायकवाड