हें सांगावें काय किरीटी । तुवांचि देखिलें आपुलिया दिठी । मी सुदामाचिया सोडीं गांठीं । पव्हयांलागीं ।। 394।। पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणे । आम्ही भावाचे पाहुणे। भलतेया ।। 395 ।। येर पत्र पुष्प फळ । हें भजावया मिस केवळ । वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ।। 396 ।। अध्याय 9 वा
माऊली याठिकाणी भगवंत परमात्मा किती अल्पसंतोषी आहे यावर भाष्य करतात, हे सोदाहरण स्पष्ट करताना भगवंत म्हणतात, मी मूठभर पोह्यांसाठी माझा मित्र सुदाम देवाच्या पुरचुंडीच्या गाठी सोडल्या होत्या.मी एक केवळ भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमभाव जाणतो. त्या भक्तीत अर्पण करावयाचे उपचार लहान लहान आहेत का मोठे आहेत?
याला मी महत्त्व देत नाही किंवा तो भक्त वयाने, वर्णाने, आश्रमाने, तपाने, धनाने, विद्येने, ज्ञानाने मोठा आहे का लहान आहे? हे मी जाणत नाही. आम्ही कोणत्याही भक्ताच्या प्रेम भावाचा स्वीकार करणारे अतिथी आहोत.
मुख्य प्रेमाशिवाय अर्पण होणारे इतर पत्र, पुष्प, फळ, जल हे सर्व अवांतर पदार्थ माझी भक्ती प्रकट करण्याची निमित्ते आहेत. माझ्या प्राप्तिकरिता केवळ नि:सीम, नि:स्वार्थी प्रेम भक्तीच आवश्यक आहे.