– मेघना कालेकर
निवासी संकुल व त्यातील व्यवस्थापन यातील प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहेत. त्याबाबत…
वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण यामुळे दैनंदिन जीवनावश्यक सुविधा, गरजा यावर बराच मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मोठ-मोठ्या गृहनिर्माण संस्था, त्यातील ऍमिनीटीज, कॉमन सुविधा, एका पेक्षा जास्त इमारती (विंग्ज) असतील तर अनेक नवीन प्रश्न उभे राहतात. या सर्व सुविधांचे नियोजन करण्यासाठी पदाधिकारी समिती सर्व सहमतीने नेमली जाते. नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून निवासी संकुल अत्याधुनिक, तसेच शारीरिक श्रमाचा योग्य वापर करून उत्तम ठेवण्याचा प्रयत्न असतो. अनेक ठिकाणी नवनवीन कल्पना, उपक्रम व त्यातून मिळणारे उत्पन्न याची सांगड योग्य प्रकारे घातली जाते.
दरम्यान अनेक वेळा- 1) कचरा वर्गीकरण गांभीर्याने घेतले जात नाही. 2) वेगवेगळ्या इमारतींमध्ये कमीअधिक (विषम) प्रमाणात सदनिका असतील तर त्यासाठी होणाऱ्या कॉमन अत्यावश्यक सुविधा (जनरेटर, पाणी, लिफ्ट, सोलर प्लांट, पार्किंग आणि अजून इतर काही यासाठी आवश्यक निधी जमा करणे व त्याची अंमलबजावणी करणे यासाठी एकमत होत नाही. परिणामी या समस्या अधिक प्रमाणात जटील होतात.
3) पदाधिकारी-सदस्य यामध्ये कमी-अधिक मतभेद असतात. सदस्य हेच पदाधिकारी होणार असतात परंतु पदाधिकारी यांनासुद्धा काही मर्यादा असतात. त्या समजावून घेणे आवश्यक आहे. महिला व पुरुष असे जरी पदाधिकारी असले तरी काही वेळा धमकावणे, असभ्य वर्तन करणे यामुळे निवासी-संकुलमध्ये सुरक्षितता, कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतो.
4) महामारीच्या काळात आपण पाहिले व अनुभवलेसुद्धा आहे की, आपले शेजारी आपल्या मदतीला तत्पर असतात. काही सदस्य नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर गावी-परदेशात असतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले दिवसभर एकाकी असू शकतात. तसेच इतर छोट्या-मोठ्या कारणासाठी आपल्याला सर्व सभासदांच्या मदतीसाठी अवलंबून असावे लागते. निवासी-संकुल एक प्रकारे कुटुंब व्यवस्थाच असते. सर्व जण वेगवेगळ्या ठिकाणाहून राहायला येतात. अडी-अडचणी, सुख-दुःख यात बरोबरीने सामील होतात.
आता नवनवीन आजाराने आलेल्या समस्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, कुटुंबाचे अर्थनियोजन तसेच नवनवीन समस्यांमुळे सर्वांनाच एकमेकांच्या मानसिक, शारीरिक आधाराची गरज असते. अशा वेळेस समजूतदारपणा, एकोपा याची गरज भासते.
पण मिळणारी अरेरावी, असभ्य वर्तणूक, वारंवार पोलीस केस करण्याची धमकी यामुळे पदाधिकारी, सदस्य यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आयुष्याची पुंजी जमवून घेतलेल्या वास्तूमध्ये मानसिक ताण, भीती यामुळे असह्य होते.
नवीन उपक्रम राबवणे वा आहे ते दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी सर्वांच्या सहकार्याची, आपुलकीची आवश्यकता असते. विविध सेवा द्यायला येणारे म्हणजे घरेलू कामकाज, स्वच्छता कर्मचारी, वॉचमन, दुधवाले, पेपर वितरण करणारे, लॉन्ड्रीसेवा, या सर्वांना सुरक्षित वातावरण मिळणे व त्यांच्याकडून परस्पर सामंजस्य मिळवणे याचा समतोल साधावा लागतो. अजून इतरत्र कोणते नवीन उपक्रम व त्यातून होणारे सकारात्मक बदल याची देवाणघेवाण असायला हवी.
अनेक सभासद वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ अनुभवी असतात, त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा अनुभव घेऊन आपापले निवासी-संकुलामध्ये उत्तम नियोजन करता येऊ शकेल. सरकार नवनवीन उपाययोजना व त्या उपक्रमातून मिळणारी कर सवलत, तसेच त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणे. मेंटनन्स जमा करणे व त्याचा योग्यप्रकारे विनियोग करणे. विविध वित्त संस्था, बॅंकांचे त्या बाबतीतले धोरण यातून आर्थिक गुंतवणूक, खर्च तसेच विविध आर्थिक ठेवी, इतर आकस्मिक खर्च याचा ताळमेळ घालणे यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले जाते.
सामूहिक इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे, येणारी नवीन आव्हाने योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडविणे, तसेच विविध नवनवीन उपक्रम राबविणे यामुळे निवासी-संकुल उत्तम उदाहरण ठरू शकतील तसेच आपल्या परिसरात भयमुक्त वातावरण, सुरक्षितता, विश्वास यामुळे अनेक चांगल्या माहितीची देवाण-घेवाण, छोटे-मोठे विधायक उपक्रम याद्वारे एकोपा, सलोखा राहण्यास मदत होईल.