जगदिश देशमुख
मागणी वाढल्यावर पुरवठा वाढला तरच ते समाजासाठी पोषक असते. पण पुरवठा वाढला म्हणून मागणी वाढली तर तेच समाजासाठी बऱ्याचवेळा घातकच असते. त्यामुळे काही गोष्टी ह्या “लिमिटेड’ होत्या त्याच बऱ्या होत्या, असं वाटणे स्वाभाविकच आहे.
पूर्वी बहुतांश गोष्टी “लिमिटेड’ होत्या व त्यामुळे आपले आयुष्य सुखी होते, जसे-
1)टीव्हीवर 1-2 चॅनल्स होते व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायचे व घरातील लोकं एकतर झोपायला जायचे, नाहीतर छान गप्पा मारायचे.
2)दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती. प्रवासाचा आनंद मिळायचा.
3)गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, ते पण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.
4)शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्हायची.
5)बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी 5-6 वाजण्याच्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची.
6)त्यावेळी पैशापेक्षा वेळेला महत्त्व होते. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या कमी होती. आता वेळ नाही त्यामुळे आजी-आजोबांसाठी वृद्धाश्रम आणि लहान मुलांसाठी पाळणाघर कमालीचे वाढलेत.
अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय. तेव्हा लहान मुलेही सुट्ट्यांमध्ये दिवसभर मैदानावर खेळत बसायचे. त्यामुळे मुलांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आताच्या मुलांना एकतर दिवाळी आणि इतर सणांच्या सुट्ट्याच कमी असतात आणि असल्या तरी ही मुले व्हिडीओ गेम, मोबाइल, टीव्हीवरील कार्यक्रम तासन्तास बघत असतात. त्यामुळे चौथी-पाचवीच्या मुलांमध्ये स्थूलपणा वाढलेला दिसतो. तेव्हाची मुले दिवसभर खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आताची मुलं दिवसभर बसून “कॉम्प्युटर गेम्स’ खेळून रात्री लेट नाइट मुव्ही एन्जॉय करत जागत बसतात. तेव्हा आपल्या घरात फक्त आजी-आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच डोळ्यांना भिंगाचा चष्मा लागतो. दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.
पालकांना फक्त मुलांच्या भविष्यासाठी पैसा कमवायचा आहे. तेव्हा वडिलांचा मुलांना फार धाक असायचा. वडील घरात यायच्या वेळेला घरात शांतता असायचीच पण त्यावेळेला दिवसभर धांगडधिंगा करणारी मुले शांतपणे शुभं करोती म्हणत बसायची किंवा अभ्यास करत बसायची. वडील रागावतील ही भीती असायची. आताची मुले वडील थोडे रागावले तर त्यांनाच मी घर सोडून जाईन, आत्महत्या करेन अशी धमकी देतात. त्यामुळे आता मुलं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे “डॅड’ त्यांना ते म्हणतील तसे वागतात.
तेव्हा मुलांना कडकडून भूक लागली तरी जेवण शिजत असायचे, मुलांना जेवणाची वाट बघत बसावे लागायचे. जेवणावर मग ते तिखट मीठ का असेना मुले अक्षरश: तुटून पडायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर “मम्मी’ मागे लागून अंजीर, पिस्ते, मनुका नको नको ते पदार्थ खायला घालायचा प्रयत्न करते तरी मुले खात नाहीत. तेव्हा मुलांना वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक लागतात.
याला जबाबदार कोण? अर्थात आताचे पालक आणि समाजव्यवस्था आहे. आजच्या समाजव्यवस्थेमध्ये मोठे घर, मोठी गाडी आणि आजी-आजोबा वृद्धाश्रमात असतील तर ते श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. त्यासाठी आई आणि वडील दोघेही रॅट रेसप्रमाणे पैसा कमावण्याच्या मागे व्यस्त आहेत. मोठे घर, मोठी गाडी आपण एकवेळ समजू शकतो पण आजी-आजोबा वृद्धाश्रमात असतील तर ते कसले श्रीमंतीचे लक्षण. जर आजी-आजोबा घरात असतील तर ते नातवांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतात. त्यांना खेळवू शकतात त्यांचे संगोपन चांगले करू शकतात. पण आजचे बहुतांशी पालक हे समाजव्यवस्थेच्या श्रीमंतीच्या चुकीच्या व्याख्येचे शिकार झाले आहेत.
कुठल्याही पालकांना विचारले तुम्ही इतके कष्ट का करता, दोघेही बाहेर 12-12, 15-15 तास काम करता हे कुणासाठी तर त्यांचे टिपिकल उत्तर असते, हे सगळे आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही करतो. हे उत्तर ते कधी कधी त्यांच्या मुलांनाही ऐकवतात. खरंच पालकांच्या अशा वागण्यामुळे त्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे का? ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळे करता त्यांनाच जर तुम्ही वेळ देत नसाल, तर ते शाळेत काय करतात, घरी आल्यावर काय करतात. त्यांचे मित्र कोण आहेत. ते रिकामा वेळ कसा घालवतात. रिकाम्या वेळेत ते काय करतात. हे बघायला जर पालकांना वेळ नसेल तर मुलांचे भविष्य कसे घडणार?
श्रीमंतीच्या चुकीच्या व्याख्येला, चुकीच्या दिशेने चाललेल्या समाजव्यवस्थेला पालक म्हणून आपणच जबाबदार आहोत. आपल्याला सगळ्यांना मिळून चुकीच्या दिशेने चाललेल्या समाजव्यवस्थेला योग्य दिशेला आणावे लागेल. पूर्वीच्या काळात समाजात फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं आणि आता बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यांवरील “सेमिनार्स’ अटेंड करावे लागतात. ह्याला वेळीच आवर घातला नाही तर संपूर्ण समाज या चुकीच्या समाजव्यवस्थेचा शिकार झाल्याशिवाय राहणार नाही.