राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक
जग वेगाने बदलते आहे, शिक्षण तरी त्यास कसे अपवाद असणार! एकविसाव्या शतकात शिक्षणातही अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडताना दिसत आहेत. करोनामुळे तर सर्वव्यापी बदल घडून आले, एकूणच काय म्हणाल, तर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने जग बदलत आहे. शिक्षणातील स्थित्यंतराचा व आगामी काळातील होऊ घातलेल्या बदलांचा धांडोळा!
बदल ही काळाची गरज असते. भारतीय शिक्षण पद्धती, शैक्षणिक धोरणे यांचा विचार करता काळाची गरज लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल केलेले दिसून येतात. काळानुसार बदलणाऱ्या गोष्टीच आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतात, हे आपल्याला माहीत आहे. 21व्या शतकाचा विचार केला, तर मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत असताना आपण पाहात आहोत. या बदलांबरोबर जुळवून घेण्यासाठी माणूस अक्षरशः
धावत आहे. या सर्वांशी जुळवून घेऊन यशस्वी वाटचाल करावयाची असेल तर शिक्षणामध्येसुद्धा कालसुसंगत बदल करणे आणि ते सर्वांनी स्वीकारणे अनिवार्य आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे, हे आपण अनुभवत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झालेला दिसून येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील तरतुदी पाहिल्या तर आगामी काळातील शिक्षण व्यवस्थेतील क्रांतिकारी बदलांची चाहूल लागते.
गेली दोन वर्षे संपूर्ण जग करोना महामारीला सामोरे जात आहे. सेकंदाच्या काट्यावर धावणारं जग अक्षरशः स्तब्ध झालं होतं. याचा सर्वात मोठा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झालेला दिसून येतो. या संकटाने पारंपरिक शिक्षण पद्धतीची व्याख्याच बदलून टाकली. ऑनलाइन शिक्षण, व्हर्च्युअल क्लासरूम, ई साहित्य, ऑनलाइन परीक्षा या तशा अपवादाने वापरल्या जाणाऱ्या, चर्चिल्या जाणाऱ्या संकल्पना केवळ परिचित झाल्या असे नव्हे तर दैनंदिन अध्ययन-अध्यापनाच्या अविभाज्य भाग बनल्या.
चार भिंतींमध्ये खडू, फळा, एखादे चित्र, तक्ता यांच्या मदतीने प्रत्यक्ष समोरासमोर बसून शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडवून आणणे ही आपली पारंपरिक शिक्षण पद्धती होती. या पद्धतीला मर्यादा आल्या. प्रत्यक्ष विद्यार्थी समोर नसतानाही अध्यापन कसे करावे याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली. यासाठी वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर सुरू झाला. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील विविध ऍप, त्यातील फंक्शन, स्क्रीन शेअरिंग, ऑडियो, व्हिडिओ शेअरिंग याचा वापर सुरू झाला. शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वांनाच हे बदल स्वीकारावे लागले.
हे बदल केवळ अध्ययन अध्यापन पद्धती मध्येच झाला असे नव्हे, तर मूल्यमापन पद्धतीमध्येही झाले. विविध चाचण्या, परीक्षांचे आयोजन ऑनलाइन करण्यात येऊ लागले. राष्ट्रीय व राज्य स्तरावरून काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले. व्हॉट्सऍप स्वाध्याय सारखा उपक्रम राज्याच्या शिक्षण विभागाने हाती घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांचे इयत्ता, विषय व अध्ययन निष्पत्तीनिहाय मूल्यमापन करून संपादणूक वाढविण्यास चालना देण्यात आली. दिशा प्लॅटफॉर्मच्या मदतीने प्रत्येक वर्गातील विषयनिहाय संबोधावर शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.
पालक, विद्यार्थी व शिक्षक प्रत्येकाची भूमिका या माध्यमातून प्रभावीपणे पार पडेल अशा पद्धतीचे मार्गदर्शन प्राप्त झाले. शासन, शिक्षक, संस्था यांनी प्रयत्नपूर्वक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकतील आणि शिकतील यासाठी प्रयत्न केले. यामध्ये ऑनलाइन शिक्षण प्रणालीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. खडू, फळा, पाठ्यपुस्तक, चित्र, तक्ते, नकाशे, आलेख, मासिके ही अध्ययन अध्यापनाची पारंपरिक साधने आहेत. त्याची जागा संगणक,
एलसीडी प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, पीपीटी, पेनड्राइव्ह, व्हर्च्युअल क्लासरूम, मोबाइल, विविध ऍप इत्यादींनी व्यापलेली दिसून येते. शिक्षक आणि विद्यार्थी परस्परांसमोर नसल्यामुळे नवीन साधनांचा वापर वाढला असे समजून चालणार नाही. यापुढे शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये या आधुनिक साधनांचा वापर होत राहणार आहे आणि कालांतराने तो वाढतच जाणार आहे.
पूर्वी शिक्षक हा माहिती मिळवण्याचा एक प्रमुख स्रोत होता, परंतु इंटरनेटमुळे असंख्य पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध झाले आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ माहिती पुरवून चालणार नाही, तर आवश्यक माहिती कशी आणि कुठून मिळवावी याचे कौशल्य शिकविणे गरजेचे आहे. माहितीच्या असंख्य स्रोतांमधून नेमकी आणि उपयुक्त माहिती कशी मिळवावी आणि तिचे ज्ञानामध्ये कसे रूपांतर करावे याचे मार्गदर्शन करावे लागणार आहे. ही जबाबदारी केवळ शिक्षकच नव्हे तर संस्थाचालक आणि पालक यांनासुद्धा अत्यंत प्रभावीपणे पार पाडावी लागणार आहे. नवीन शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्था व समाज यांची असणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ शालेय शिक्षणातील अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन एवढ्यापुरताच मर्यादित राहणार नाही. शासन, खासगी कंपन्या, विविध संस्था यामधील नोकर भरतीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर सुरू असल्याचे दिसून येते. ऑफलाइन परीक्षा पद्धतीमध्ये होणारे गैरप्रकार, नियंत्रण ठेवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, लागणारे मनुष्यबळ या सर्वांचा विचार करता तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त मदत घेणे क्रमप्राप्त असल्याचे दिसून येते.
अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांनी पारंपरिक भरती प्रक्रिया, ऑफलाइन परीक्षा यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी काळात या सर्वांसाठी तंत्रज्ञानाचाच वापर केला जाईल. करोना जागतिक महामारीने आपल्याला केवळ तोंडओळख असणाऱ्या शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करायला भाग पाडले. हे जागतिक संकट दूर झाले तरी, शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर कमी होणार नाही, उलट तो वाढतच जाणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील शैक्षणिक तंत्रज्ञानाला केवळ ही सुरुवात समजून त्यावर स्वार होणे ही आपली सर्वांची गरज आहे. तर व्हा तंत्रज्ञानावर स्वार!