भारत-पाकिस्तान सीमेवर ज्या प्रमाणे गोळीबार होतात, तसे भारत-चीन सीमेवर होत नाही. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की होते. चीन आपल्या वस्तू भारतात विकून प्रचंड नफा कमवितो. त्यामुळे त्यांची आर्थिक ताकद वाढते. ही आर्थिक ताकद चीन लष्कर बलाढ्य करण्यास वापरतो. म्हणजे भारतात कमावलेल्या पैशांचा वापर करून चिनी सैन्य भारताला त्रास देते.
करोना हे चीनने जगावर लादलेले तिसरे महायुद्ध आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यामध्ये जगाचे आणि भारताचे जेवढे नुकसान झाले आहे, तेवढे सगळ्या युद्धांना एकत्र करून सुद्धा कधीच झालेले नव्हते. म्हणूनच करोनाला चिनी व्हायरस म्हणायला पाहिजे आणि यामुळे जगाचे झालेले नुकसानभरपाई करण्यास चीनला भाग पाडले पाहिजे.
भारताची करोनाच्या विरोधातील लढाई सुरू असताना, चीनबरोबर संघर्षही वाढत आहेत. करोनाच्या मुद्द्यावर भारतासह 72 देशांनी चीनची कोंडी केल्यानंतर, भारताला जखडून ठेवण्यासाठी चीनने सीमेवर आक्रमक कारवाया सुरू केल्या आहेत. चीनचा समाचार घेण्याची हीच वेळ आहे.
लडाखमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य तैनात झाले असून दीर्घकाळ ही संघर्षाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सरकारने सीमाभागामध्ये सुरू असलेली विकासकामे कुठल्याही परिस्थितीत थांबवायची नाहीत, हा निर्धार केला आहे. चीनची दादागिरी सहन करणार नाही, हे भारताने डोकलाम संघर्षाच्या वेळीच दाखवून दिले होते. त्यामुळे आतासुद्धा लडाखमध्येही दीर्घकाळ तणावाची स्थिती राहू शकते, त्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे.
सीमेवर दोन्ही बाजूच्या सैनिकांनी तंबू ठोकले असून तिथे अतिरिक्त सैन्य तुकड्यांची कुमक, साहित्य आणि आवश्यक रसद पाठवण्यात आली आहे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. पण अजून कुठलाही तोडगा निघालेला नाही. भारताने आतापर्यंत फक्त एकदाच या संपूर्ण वादावर अधिकृत भाष्य केलं असून चीनला या संघर्षाच्या स्थितीसाठी जबाबदार धरले आहे.
भारत-चीन सीमेवर तणाव
वर्चस्व गाजवण्याची चीनची जुनी खोड आहे. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 3 हजार 488 किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते. सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागलेली आहे- पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.
चीनने लडाखच्या पूर्व भागतल्या पॅंगोंग त्सो तलावात गस्तीनौका वाढवल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी याच तलावाजवळ भारत आणि चिनी जवानांमध्ये चकमकही झाली होती. लडाखमधल्या नियंत्रण रेषेजवळचा हा परिसर आहे. 2015 पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर 80 टक्के घुसखोरीच्या घटना या लडाख भागात झाल्या आहेत.
नथुला खिंडीजवळ भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त 10 मे रोजी आहे. ही खिंड भारतात सिक्कीम आणि तिबेटमध्ये दक्षिणेकडच्या चुम्बी खोऱ्याला जोडते. लडाखच्या गालवान व्हॅली या भागामध्ये मोठा तणाव आहे. कारण इथे बांधकाम सुरू आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंत रस्ता बांधण्यात आला आहे. दौलत बेग ओल्डीमध्ये भारताने अत्याधुनिक धावपट्टीसुद्धा बनवली आहे. ही जगातील सर्वात उंचावरील धावपट्टी असून इथे इंडियन एअर फोर्सचे विमान उतरू शकते. सामरिक दृष्टीने भारतासाठी ही महत्त्वाची बाब आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डी याच मार्गाने भारत काराकोरम हायवेपर्यंत पोहोचू शकतो. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंतचा रस्ता 2019 सालीच बांधून पूर्ण झाला आहे.
अक्साई चीनमधल्या गॅलवान खोऱ्याजवळ चिनी सैन्याचे तंबू दिसून आले. अर्थात, भारतानेही सीमेजवळच्या आपल्या भागात सैन्याची तैनात वाढवली. यामागचं कारण म्हणजे भारत आणि चीन यांच्यात झालेल्या एका करारात दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष नियंत्रणरेषा मान्य करण्याचं आणि त्या भागात कुठलंही बांधकाम न करण्याचं मान्य केलं आहे. मात्र, चीनने आपल्याकडच्या भागात याआधीच आवश्यक सैन्य उभारणी केली आहे आणि आता मात्र आहे ती परिस्थिती कायम ठेवावी, असं चीनचं म्हणणं आहे. मात्र, आपली सैनिकी बाजू बळकट करण्यासाठी भारतालाही लष्करी बांधकाम करायचं आहे.
134 किमी लांब पॅंगोंग त्सो तलाव हिमालयात समुद्रसपाटीपासून जवळपास 14 हजार फुटांहून अधिक उंचीवर आहे. या तलावाच्या 45 किमी क्षेत्रफळाचा भाग भारतात आहे. तर 90 किमीचा परिसर चीनमध्ये आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा या तलावाच्या मधून जाते. पश्चिम सेक्टरमध्ये चीनकडून होणाऱ्या अतिक्रमणाच्या घटनांपैकी एकतृतीयांश घटना याच पॅंगोंग त्सो तलावालगतच्या परिसरात होत आहे.
2017 साली डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात बराच वाद झाला होता. 82 दिवस हा वाद पेटला होता. भारतीय सैन्याने अखेर चीनला येथून माघार घेण्यास भाग पाडले. चीनने डोकलाममध्ये रस्ता बांधला असता तर ईशान्य भारताला देशाशी जोडणाऱ्या 20 किमीच्या अरुंद सिलिगुडी कॉरिडॉर किंवा “चिकन नेक’पर्यंत पोहोचणे शक्य झाले असते.
नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान ओलींना म्हणावे लागले की, भारतीय करोना विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे. कारण चीन-नेपाळच्या मानगुटीवर बसलेला आहे.
काय करावे
गेल्या तीन आठवड्यांपासून लडाख, सिक्कीम भागात चीन घुसखोरी करून भारतावर दबाव आणत आहे. याचबरोबर नेपाळला भारताविरोधात फितूर केले आहे.
भारताने चीन विरोधात कणखर भूमिका घ्यायला हवी जशी आपण डोकलाम प्रसंगात घेतली होती. सध्या जग करोनामुळे हैराण झाले आहे आणि चीन विरोधात गेले आहे. चीन भारताला पाकिस्तानच्या मदतीने भारतीय उपखंडात दहशतवाद आणि अराजकता माजवून अडकविण्याचा प्रयत्न करत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर चीनची चौकशी व्हावी यासाठी जगभरातून दबाव तयार होत आहे. यात अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिका सध्या चीनविरोधी राष्ट्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यात भारताचाही समावेश आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या जाळ्यात न फसता आपल्या विवेकानेच निर्णय घ्यावा.
– ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)