पारनेर -पारनेर तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा काही प्रमाणात तडाखा बसला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळा, घरे, फळबागा आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम आज सुरू होते.
राज्यभर चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला. बुधवारी (दि.3) तालुक्यामध्ये दुपारी तीन वाजल्यापासूनच सोसाट्याचा वारा सुरू झाला. या वाऱ्यामध्ये पारनेर शहरातील कोर्ट परिसर, आंबेडकर चौक व पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झाडे कोसळली. वडनेर बुद्रुक येथील शाळेचे पत्रे उडून गेले. तसेच तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, निघोज, देसवडे, करंदी, ढवळपुरी या ठिकाणच्या डाळिंब, आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तालुक्यातील विविध भागांमध्ये 44 घरांची काही प्रमाणात पडझड झाली. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे शेडनेट व शेततळ्यांच्या कागदाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंधराशे हेक्टर दिलेला आहे. त्याचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात नुकसान झालेल्या घरांचे, गोठ्यांचे, पिकांचे पंचनामे करून सदर अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्यासाठी तालुक्यातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना आदेश देण्यात आले आहेत.
ज्योती देवरे , तहसीलदार, पारनेर