चंद्रकांत पाटील : राज्य सरकारला डिवचले
पुणे – ‘करोनासारखा गंभीर विषय असताना, धडाधड निर्णय घेणारे अजित पवार शांत कसे? त्यांच्याकडून आवश्यक निर्णयही तातडीने घेतले जात नाहीत, याचे आश्चर्य वाटत आहे,’ असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना पुढे करत महाविकास आघाडीच्या सरकारला डिवचले आहे.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे उपस्थित होते. पाटील म्हणाले, “अजित पवार यांच्या स्वभावानुसार सांगायचे झाले, तर ते सध्या बोलतही नाहीत. याचे कारण शोधायला लागेल. सध्याच्या गंभीर स्थितीत महापौर मुरलीधर मोहोळ रात्रंदिवस काम करत असून त्यांना आपण 100 गुण देऊ, तर अजित पवारांना शून्य गुण देऊ.’