पुणे – शहरातील काही पीएमपी चालक बसस्टॉपवर बस थांबवत नसल्याच्या तक्रारी अनेकवेळा आल्या. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मनस्ताप सहन करावा लागतो. याचाच अनुभव खुद्द पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांना आला. विश्रांतवाडी येथील बसथांब्यावर उभे राहून बसला हात करूनही बस थांबली नाही. चालकाचा हा बेजबाबदारपणा चांगला अंगलट आला असून, अध्यक्षांनी संबधित चालकावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
पीएमपीचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सचिंद्र सिंह यांनी एक दिवसाचा पास काढून बस संचलन कसे चालते, प्रवाशांना सेवा कशी मिळते यासह अन्य बाबींची पाहणी प्रत्यक्ष बसने प्रवास करून केली. अध्यक्षांनी पहिल्यांदा शिवाजीनगर येथे बसमध्ये बसून मनपा ते आळंदी असा प्रवास केला. बसमध्ये गर्दी असल्यामुळे त्यांनी उभे राहून प्रवास करत, प्रवाशांची बससेवेबाबत चर्चाही केली. विश्रांतवाडी येथे उतरल्यानंतर पुन्हा शिवाजीनगरला जाण्यासाठी त्यांनी विश्रांतवाडी ते पुणे स्टेशन या बसला हात केला. मात्र, नेहमीप्रमाणे बसचालकाने बसस्टॉपला बस न थांबवता पुढे निघून गेला. मात्र, ज्यांनी हात केला ते पीएमपीचे नवे अध्यक्ष होते, असे समजताच चालक अणि वाहक दोघे हादरले.
पीएमपी ही प्रवाशांसाठी आहे, ते पीएमपीचे दैवत आहेत. त्यांना चांगली सेवा देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. मला जो अनुभव आला, तो यापुढे कोणत्याही प्रवाशाला येऊ नये, चालक आणि वाहकांनीही प्रत्येक बसस्टॉपवर बस थांबवावी. प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन करू नये, असे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले.