कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी कडून विधान परिषदेची ऑफर स्वीकारल्या नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजी नाट्य सुरू झालं आहे. यामुळं संघटना फुटीच्या मार्गावर आहे. यावरती राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात प्रतिक्रिया दिली.
एक वेळ स्वतःचा बळी देईन पण चळवळ वाचवेन अस राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. रक्त सांडून उभा केलेली संघटना फोडण्याचा कुणाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही अस सांगत कुणा एका व्यक्तीमुळे संघटना संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत असही त्यांनी स्पष्ट केलं. पण मी हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही अस देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेच्या जागेबाबत शेट्टी म्हणाले, शरद पवार आमच्यावर दया करावी म्हणून विधानपरिषदेची जागा देत नाहीत. जो समझोता झाला होता त्यानुसारच ही जागा दिली जात आहे. तसेच आघाडीच्या नेत्यांनी मीच ती जागा घ्यावी, असा आग्रह केला.
शरद पवार यांची सर्व मतं मला पटतात असं नाही. सर्व मतं पटली असती तर मी त्यांच्या पक्षात गेलो असतो, अशी टोलेबाजीही शेट्टी यांनी केली. राज्य सरकारने घेतलेले सर्व निर्णय मला मान्य असतील असे नाही. हे यापूर्वीही घडले नाही आणि नंतरही घडणार नाही. शेतकऱ्यांना अधिक पाहिजे ते मी मागत राहणार. असेही त्यांनी स्पष्ट केले.