बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
मुंबई: केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधला. मुंबईतील पदपथ सुंदर करण्यासाठी आयोजित प्रदर्शनास देखील त्यांनी भेट दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी सहायक आयुक्तांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, उद्याने, मनोरंजन मैदाने, मंडई, शालेय परिसर, आरोग्य, पाणी आदी विविध नागरी सेवा- सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी प्रत्येकाने एक संघ म्हणून काम करावे. यासाठी मुंबईत असलेल्या विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा.
अवैध फलकांवर कारवाई आवश्यक
मुंबईत हवा प्रदुषणाबरोबरच दृष्यमानताही कमी होत आहे. यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महानगरपालिकेने जाहिरात फलक धोरण आखावे. तसेच अवैध व विना परवाने फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी. अवैध फलकांना आळा घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांशी स्वतः संवाद साधू, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या सहायक आयुक्तांचा गौरव करणार
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, शहरामध्ये जागोजागी डेब्रिज, कचरा टाकणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी. तसेच डेब्रिज, कचरा वेळोवेळी उचलण्यात यावा, यासाठी मुंबई डेब्रिजमुक्त व कचरामुक्त करण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात यावी. तसेच वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करणे, पदपाथ सुव्यवस्थित राखणे, रेलिंग व्यवस्थित ठेवणे, स्थानिक वातावरणात टिकणारी व फुलणारी झाडे लावणे आदी कामांना प्राधान्य द्यावे. तसेच सेवा मार्गावरील भिंती सुशोभित करण्यासाठी मुंबईतील जागतिक दर्जाच्या कलाकारांची मदत घ्यावी. मुंबईतील 52 पैकी 50 मंडईच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन मंडईचा विकास करण्यासाठी महापालिकेने लक्ष द्यावे. या सर्व कामांच्या आढाव्यासाठी दर तीन महिन्यांनी सहायक आयुक्तांची बैठक घेण्यात येईल. तसेच चांगले काम करणाऱ्या सहायक आयुक्तांचा या बैठकीत सत्कार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई विकास नियमावलीनुसार विकास होतो की नाही, याकडेही लक्ष देण्यात यावे. विकास हा सर्वांगिण असायला हवा. रस्ते, पदपथ याबरोबरच सेवामार्गावरील हरित पट्टा, उड्डाणपुलाखालील जुनी वाहने काढून तेथील जागांचे सौंदर्यीकरण याकडेही लक्ष द्यायला हवे. नागरिकांना सोयीबरोबरच चांगल्या सुविधा दिल्या तर त्याचा वापर वाढतो. त्यामुळे चांगले पदपाथ दिले तर त्याचा वापर नक्कीच वाढेल. तसेच मुंबईच्या लौकिकात भर पडून मुंबई पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढेल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईत या वर्षी पाणी साचणार नाही, यासाठी नाले, पदपथ, गटारे यांची स्वच्छता करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच महानगरपालिकेला येणाऱ्या अडचणी राज्य शासनाच्या निदर्शनास आणल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी – एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले की, पदपथ व्यवस्थित नसल्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे महानगरपालिकेने पदपाथाच्या दुरुस्ती व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे. डेब्रिज व माती टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. रस्ते, पदपाथ, वाहतूक बेटे यांचे सौंदर्यीकरणाचे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्यास त्या सर्व महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येतील.