कराड – कराड तालुक्यातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने बाजी मारत सत्ता मिळाली आहे. याठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व शिंदे समर्थक आ. शंभूराज देसाई यांच्या गटाने तब्बल 22 वर्षांनी सत्तांतर घडवत पाटणकर गटाला धोबीपछाड दिली आहे. तर कोयना वसाहत ग्रामपंचायतीत भाजपच्या डॉ. अतुल भोसले गटाने आपली सत्ता कायम राखत दणदणीत विजय मिळवला आहे.
तालुक्यात गुरुवारी 4 रोजी झालेल्या सात ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचा निकाल शुक्रवारी 5 रोजी सकाळी जाहीर करण्यात आला. यामध्ये कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत शिंदे गटाने तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत जिंकत विजयी सलामी दिली. उत्तर तांबवे येथे सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल आणि जय हनुमान ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. युवा उद्योजक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्राम विकास पॅनेलने 4-3 असे सत्तांतर करत विजय मिळवला. उत्तर तांबवे येथील सत्ताधारी पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले. तर आ. शंभूराजे देसाई व रयत कारखान्याचे चेअरमन ड. उदयसिंह पाटील यांच्या गटाने एकत्रित 4 जागा मिळवत याठिकाणी सत्तांतर घडवले. त्यामध्ये रोहित बाबुराव चव्हाण 98), जयसिंग बंडू पाटील (120), शशिकांत चव्हाण (103), विद्या साठे (94), रूपाली पवार (116), बानुबी मुल्ला (107) व भारती चव्हाण (102) अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.
तर तालुक्यातील महत्वपूर्ण ग्रामपंचायतींमधील कोयना वसाहत ग्रामपंचायतींत भाजपच्या डॉ. अतुल भोसले गटाने आपली सत्ता कायम राखत याठिकाणी 10-1 असा दणदणीत विजय मिळवला आहे. डॉ. भोसले यांच्या स्व. राजेंद्र पाटील कोयना वसाहत विकास आघाडी पॅनलने 10-1 असा विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. तर एका अपक्षाने या निवडणुकीत बाजी मारली. यामध्ये निलेश भोपते (274), कुसुम पुजारी (419), विनायक कुलकर्णी (327), सुवर्णा वळीव (301), सम्राट पाटील (263), रजनी गुजर (276), उमेश कुलकर्णी (202) व संगीता पाटील 220, सुनिता भोसले (270), चंद्रशेखर पाटील (315) व शितल जाधव (32) हे विजयी झाले आहेत.
बेलवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंगेस व राष्ट्रीय कॉंग्रेस पुरस्कृत गाररजाई माता ग्रामविकास पॅनेलने 5 जागांवर विजय मिळवला. विरोधी जय हनुमान ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलने फक्त 2 जागा मिळाल्या. यामध्ये अमर बोबडे (101), वनिता संकपाळ (104), वनिता वि. संकपाळ (119), अमोल फडतरे (109) भारती फडतरे (114) तसेच वैशाली फडतरे (90) व प्रमोद गायकवाड (137) हे उमेदवार विजयी झाले आहेत. याठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक आघाडीला सत्ता मिळाली आहे.
नाणेगाव बुद्रुकमध्ये संभाजी बोलके (36), दिपाली बोलके (32), नम्रता बोलके (35) व वसंत भोसले (96) हे विजयी झाले. शितळवाडी ग्रामपंचायतीत प्रशांत बर्गे (79), किणी यादव (77), अरुण शितोळे (77), उज्वला बर्गे (76), युवराज शितोळे (107) व अंजली शितोळे (108) हे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच पश्चिम उंब्रज ग्रामपंचायतीत प्रमोद घाडगे (49), रेखा घाडगे (48), धनश्री घाडगे (66), शहाजी घाडगे (37) व अन्य दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीच्या 5 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 2 जागांवर सागर चव्हाण (111) व बालासो चव्हाण (98) हे विजयी झाले आहेत. या चारही ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे.
दरम्यान, येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासकीय कार्यालयाबाहेर सर्व ग्रामपंचायतींचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे अत्यंत शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायत पक्षीय बलाबल
शिवसेना – 0
भाजप 1 – कोयना वसाहत
शिंदे गट 1 – उत्तर तांबवे
राष्ट्रवादी 4 – शितळवाडी, उत्तर कोपर्डे, पश्चिम उंब्रज व नाणेगाव बुद्रुक
कॉंग्रेस – 0
इतर स्थानिक आघाडी – 1 – बेलवाडी (कॉंग्रेस व राष्ट्रवादी समर्थक स्थानिक आघाडी)