पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर आगारातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मंगळवारी (दि. 7) महिना पूर्ण झाला. सोमवारी राज्यातील काही आगारात कर्मचारी कामावर रुजू झाले आणि एसटी सेवा काही अंशी सुरू झाली.
परंतु वल्लभनगर आगारात आंदोलनात सहभागी 194 कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. त्यामुळे महिना उलटल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, महामंडळाकडून आणखी तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगाराबाहेर गेल्या महिनाभरापासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आत्तापर्यंत 23 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर, सोमवारी आणखी तिघांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 26 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर, 6 जणांच्या बदल्या केल्या आहे.
आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, “दैनिक प्रभात’च्या प्रतिनिधीने कर्मचाऱ्यांशी संवाद साधला साधता या आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसोबत खुली चर्चा करायला हवी, असे मत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण व्हायला हवे, या मागणीवर अद्यापही कर्मचारी ठाम आहेत.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारने सकारात्मक विचार करायला हवा. महामंडळाकडून अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांविरूद्ध करण्यात येणारी कारवाई ही चुकीची आहे.
– दिलीप भोसले, एसटी कर्मचारी