मुंबई – लवकरात सर्व देशातील सर्व एटीएममधून क्रेडिट किंवा डेबिट कार्डाशिवाय रक्कम काढता येऊ शकणार आहे. एटीएममध्ये कार्ड वापरल्यामुळे बऱ्याच प्रमाणात फसवेगिरी होत असल्याचे आढळून येत असल्यामुळे रिझर्व बॅंकेने सर्व बॅंकांना एटीएम मधून कार्डाशिवाय पेमेंट करण्याची व्यवस्था विकसित करण्यास सांगितले आहे.
सध्या देशातील केवळ काही बॅंकांत त्यांच्या स्वतःच्या एटीएममधून स्वतःच्या ग्राहकांना अशा प्रकारची कार्डाशवाय रोख देण्याची व्यवस्था चालू आहे. आता या व्यवस्थेचे सार्वत्रीकरण होणार असल्याचे रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण जाहीर केल्यानंतर सांगितले.
कार्डाऐवजी या व्यवस्थेसाठी यूपीआईचा वापर केला जातो. यामुळे व्यवहार वेगात होण्यास मदत होईल असे रिझर्व बॅंकेला वाटते. सध्या एटीएम मध्ये कार्डचा वापर केल्यानंतर त्याचे क्लोनिंग करून संबंधित ग्राहकाच्या बॅंकेतून पैसे काढण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेकडे अनेक वेळा तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारीचा विचार केल्यानंतर कार्ड पेमेंट व्यवस्था विकसित करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात आला असे दास यांनी सांगितले.
रिझर्व्ह बॅंक लवकरच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया, एटीएम नेटवर्क आणि बॅंकांना माहिती उपलब्ध करणार आहे. भारतातील बॅंकांचे आरोग्य सध्या उत्तम आहे. बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्ता मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये नागरिकांना व कंपन्यांना बॅंका अधिक प्रमाणात कर्ज पुरवठा करू शकतील असा विश्वास दास यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.
आगामी काळामध्ये बॅंकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्याची गरज आहे. यासाठी बॅंकांनी नव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. भारतातील बॅंका अशा प्रकारची गुंतवणूक करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.