पुणे – नदीसुधार प्रकल्पातील त्रुटींबाबत “नीर’ सारख्या संस्थेकडून प्रकल्पाचे परीक्षण आणि इतर पर्यावरण विषयक संस्था, राजकीय नेते, नागरिक यांचे मते विचारात घेऊन पुढील कार्यवाही व्हावी. तसेच राज्य सरकारनेही या प्रकल्पात लक्ष घालावे असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगत नगरविकास विभागाचे सचिव आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले.
या नदी सुधार प्रकल्पात अनेक गोष्टींची कमतरता आढळते. महापालिकेने साबरमती मॉंडेल अंगिकारले असल्याने नदी वाहती न रहाता तिचे डोहात रुपांतर होणार आहे. त्यामुळे पाण्यातील प्रदूषण वाढणार आहे. नदीपात्राची रुंदी कमी झाल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी इतरत्र पसरण्याच धोका आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातून नदीत येणारे मैलापाणी प्रक्रिया करून चांगले पाणी नदीपात्रात सोडा त्यानंतरच नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घ्या.
यामुळे जलप्रदूषण कमी होईल. प्रकल्पांअंतर्गत नदी पात्रातील पूल पाडण्यात येणार असून, रस्तेही बंद करण्यात येणार, त्यामुळे वाहतुक समस्या मोठ्या प्रमाणात जाणवेल. प्रकल्प राबविण्यासाठी जवळपास सहा किंवा त्यापेक्षाही जास्त झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन त्यानंतरच हा प्रकल्प सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.