ठाणे – केंद्रात, कर्नाटकात आणि महाराष्ट्रातही भाजपाची सत्ता आहे. महाराष्ट्रात मिंदेंचे सरकार असले तरी ते भाजपाचेच आहेत. एकेकाळी आपल्या मिंदेंचा नेता बाळासाहेब होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटलेला असताना महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाही आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
ठाण्यातील एका कार्यक्रमात उद्धव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहतोय, तशी वाट कर्नाटकानेही बघणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना ते जर बेळगावला उपराजधानीचा दर्जा देत आहेत.
हे सगळे डोक्यावर पाणी गेल्यासारखे झाले आहे. तसेच, आता तर त्यांनी आणखी काही गावांवर आपला हक्क सांगितला आहे. म्हणजे बेळगाव, कारवार, निपाणी तर लांबच राहिले, त्यांना आता सोलापूर, कोल्हापूर, अक्कलकोट पाहीजे. महाराष्ट्राला कोण वाली आहे की नाही, असे म्हणत त्यांनी सवालही उपस्थित केला.