नागपूर – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा फक्त हायवे नाही, तर गेमचेंजर आहे. महाराष्ट्राची नवी लाईफलाईन बनणार आहे. दोन्ही बाजूंना इंडस्ट्रीज, नगर वसवणार आहोत. लाखो लोकांना रोजगार देणारा हायवे म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जाणार आहे. देशातील सर्वांत लांब हायवे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नागपुरात समृद्धी महामार्ग आणि इतर विकासकामांचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिल्या औद्योगिक क्रांतीचा फायदा आपण घेऊ शकलो नाही. दुसऱ्या-तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत आपण मागे पडलो, पण आज जेव्हा चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे. तेव्हा संधी भारत गमावू शकत नाही. कोणताही देश शॉर्टकटने चालत नाही. देशाच्या प्रगतीसाठी, शाश्वत विकासासाठी, कायमस्वरूपी उपायांसाठी काम करणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन खूप आवश्यक आहे.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, मी महाराष्ट्र, देशातील लोकांना देशातील राजकारणात येत असलेल्या एका विकृतीपासून सावधान करु इच्छित आहे. शॉर्टकटच्या राजकारणाची ही विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्टकट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणे हाच यांचा हेतू असतो, अशी टीका त्यांनी केली आहे. खोटी आश्वासने देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देशाचे निर्माण करु शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार आहे. ते वेगाने काम करत आहे. याआधीच्या सरकारांच्या असंवेदनशीलतेमुळे विकासकामांना विलंब झालाच, पण त्याचा खर्चही मोठा आहे. गोसीखुर्द धरणाचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, 30-35 वर्षांपूर्वी या धरणाचा पाया रचला गेला. त्याची अंदाजे किंमत 400 कोटी होती. मात्र शासनाच्या असंवेदनशीलतेमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. धरणाचा अंदाजित खर्च 400 कोटींवरून 18 हजार कोटींवर पोहोचला आहे. 2017मध्ये डबल इंजिनचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्या कामाला वेग आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील टप्प्यात नागपूर-गोवा महामार्ग
समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी राधेश्याम मोपलवार, मनोज सौनिक, प्रविण परदेशी, गायकवाड यांचे मोलाचा वाटा होता. ज्यांच्या नावाचा उल्लेख मी करू शकलो नाही त्याची मी माफी मागतो. मात्र, या टीमने जे काम केले ते खूप जबरदस्त आहे. आतापुढील टप्प्यात नागपूरहून गोव्यापर्यंत अशाच प्रकारचा महामार्ग तयार करण्यात येईल. हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला एकत्रित करेल. त्याचाही आराखडा आम्ही तयार केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.