पिंपरी, दि. 11 – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून असा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि.11) भाजपवर हल्लाबोल केला.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे “विचार वेध कार्यकर्ता प्रबोधन’ शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. शिबिराला माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले महाराष्ट्राचे दैवत आहेत. मात्र, राज्यपालांपासून भाजपच्या लोकांकडून सातत्याने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये सुरू आहेत. ही वक्तव्य थांबण्याचे नावच घेत नसताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कहरच केला आहे. नागरिकांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करणे योग्य नसून पाटील यांनी डॉ. आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांनी चालविलेल्या शाळांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. विचारांची लढाई विचारांनी लढावी, वैचारिक मतभेद असू शकतात. मात्र, शाई फेकणे याचे समर्थन होऊ शकत नाही. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असेही पवार म्हणाले.
शाई फेकप्रकरणी पोलीस दलातील 11 जणांवर निलंबनाची कारवाई केली. मंत्री किंवा राजकीय व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमात असताना पोलीस सुरक्षा व्यवस्थित असते. मात्र, खासगी कार्यक्रमाला जात असताना पोलिसांना सुरक्षेचा अंदाज येत नसल्याचे सांगत पवार म्हणाले, मंत्री पाटील यांनी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करू नका, असे माध्यमांना जाहिरपणे सांगितले. मात्र, 12 तासांच्या आतच असे काय झाले, की पोलिसांचे निलंबन झाले. तसेच व्हिडीओ दाखविला म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल करणार का? पत्रकारांचे जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्याचे कामच असते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या चुकीचे पायंडे पाडू नका. मीडिया हा देखील महत्वाचा घटक आहे.
निविदेत भ्रष्टाचार
पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या जॅकवेल निविदेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महापालिकेत सातत्याने भ्रष्टाचार सुरू असून कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटने, भूमिपूजने प्रलंबित आहेत. त्यासाठी मंत्र्यांना वेळ नसल्याची टीकाही अजित पवार यांनी केली.
महापुरूषांबद्दल बोलणाऱ्यांवर असेच गंभीर गुन्हे लावणार का?
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मंत्री, प्रवक्त्यांकडून सातत्याने महापुरूषांबद्दल बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. याला कोण आळा घालणार? असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, शाई फेकणाऱ्यांवर जसे गंभीर गुन्हे दाखल केले तसेच गुन्हे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवरही लावले पाहिजेत आणि तसे गुन्हे लावणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महारांचे नाव घेऊन सत्ता मिळवता. निवडणुका जिंकल्यावर पेढे भरवण्यासाठी रस्त्यावर उतरता. मात्र, त्यांचा अवमान केल्यावर त्यांना रस्त्यावर उतरायला लाज वाटते का?, असेही पवार म्हणाले.